जिवती : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चंद्रपूरद्वारा
विकेल ते पिकेल या संकल्पनेंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थापनेला जिवती तालुक्यात यशस्वी सुरुवात करण्यात आली.
यामध्ये हळद, केळीसोबत भाजीपाला व्यवसाय करणारे नामदेव जुमनाके या शेतकऱ्याच्या बांधावर जे विकेल ते पिकेल या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित कृषी अधिकारी पल्लवी गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नीलेश पेंदाम, प्रेमानंद पंडित, रामटेके व शेतकरीबांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपविण्याची गरज आहे. त्यांच्या कामातून भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला आणखी पुढे कसे नेता येईल, याचा मार्ग दिसला पाहिजे. संघटित शेती आणि संघटित शेतकरी ही संकल्पना राबवून जे विकले जाईल तेच पिकवायची गरज असून शेतकऱ्यांना संघटित करताना विभागवार निश्चित केलेल्या दर्जाचीच पिके पिकतील, ती बाजारपेठेत विकली जातील, यादृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले. अशा उत्पादनांना, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी त्याचे मार्केटिंग कसे करता येईल, याचाही विचार व्हावा, असे त्यांनी सांगितले.