सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : समता व सामाजिक न्याय सप्ताहाचा समारोपचंद्रपूर : जयभीम हा फक्त शब्द नव्हे तर आपल्या अंतर्मनाला आत्मविश्वास देणारी शक्ती आहे. आपला आत्मविश्वास तरूणांनी आणि विद्यार्थ्यांनी वाढवावा, जयभीम बोलो- विकास की ओर चलो हा नारा देत समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, व्ही. डी. मेश्राम व सत्यपाल काटकर यावेळी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, शिक्षणामुळेच आपला देश जगाचे नेतृत्व करेल, असे बाबासाहेब नेहमी म्हणायचे. मी स्वत: नगर परिषदेच्या महात्मा गांधी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. पाचवी वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे किंवा जे कॉन्व्हेंटमध्ये आपल्या पाल्यांना शिकवू शकत नाहीत, अशांसाठीच नगर परिषदेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षणाचे केंद्र ठरले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत बदल करावा, असे माझे स्वप्न आहे. त्यासाठीच चंद्रपूर मनपा क्षेत्रातील व बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातील शाळांचे नुतनीकरण व त्याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. यासोबतच जिल्हा परिषदेच्या ६०० शाळांमध्ये ई-लर्निंगची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. लवकरच या ६०० शाळांमध्ये ई-लर्निंगची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडत असताना डोळयासमोर होते ते बाबासाहेबांचे विषमतामुक्त समाजाचे स्वप्न. त्या दृष्टीनेच राज्यातील १० हजार अंगणवाड्या आदर्श करण्यासाठी १०० कोटीची तरतूद केली असून चंद्रपूर जिल्ह्यातील ७५० अंगणवाड्या आदर्श करण्याचा आमचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून बल्लारपूर, चिमूर आणि ब्रम्हपूरी या ठिकाणी मागासवर्गीय मुलींची तीन वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून जगातील तरूणांसाठी हे स्मारक समता, ममता, बंधुत्वाचा विचार देणारे केंद्र ठरेल, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षात अर्थमंत्री म्हणून त्यांना अभिवादन करण्याचे सौभाग्य मला लाभले. माई रमाबाई आंबेडकरांचे गाव आदर्शगाव म्हणून विकसित करण्यासाठी मी दिलेल्या शब्दाप्रमाणे आर्थिक तरतूद करू शकलो, याचा मला आनंद आहे. बाबासाहेबांचे लंडन येथील घर स्मारक म्हणून विकसित करण्याचा तसेच जपानमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारला आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीचा अ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मी आणि मुख्यमंत्री असे भाग्यशाली आहोत की ज्यांच्या नागपूर व चंद्रपुरात बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली आहे. त्यामुळेच बाबासाहेबांच्या विचारावर राज्य चालविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. दलित, आदिवासी तरूणांनी जॉब सिकर म्हणून नव्हे जॉब क्रियेटर म्हणून स्वत:ला सिध्द करावे. यासाठी मुद्राबँक, स्टॅन्डअप योजनेचे सहकार्य त्यांनी घ्यावे, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.जगातील अनेक देशात आज बाबासाहेब यांची जयंती साजरी होत आहे, असे प्रथमच घडत आहे. बाबासाहेबांनी सर्व समाजाला न्याय मिळावा, यासाठी संघर्ष केला. म्हणून त्यांना केवळ एका समाजात बांधता येणार नाही तर ते सर्व देशवासीयांचे होते, असे ना हंसराज अहीर म्हणाले. बाबासाहेब यांचा संघर्ष हा विचारांचा होता. आज उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांवर त्यांनी त्याकाळी लिहून ठेवले आहे. पाणी, आरोग्य, शेती यासारख्या विषयावर त्यांनी लिखाण केले. म्हणूनच ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे ते म्हणाले. बाबासाहेब हे भारतमातेचे खरे सुपुत्र होते, देश भक्त होते. देश व देशभक्तीला सर्वोच्च मानणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण आपल्या जीवनात नेहमी करा असे आवाहन ना. अहीर यांनी केले. यावेळी नाना शामकुळे, व्ही. डी. मेश्राम आणि सत्यपाल काटकर यांचीही भाषणे झाली. संध्या गुरनुले व महापौर राखी कंचर्लावार यांना बाबासाहेब यांची प्रतिमा व घटनेची उद्देशिका देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी संचालन सचिन फुलझेले यांनी केले. आभार सुनील जाधव यांनी मानले. (प्रतिनिधी)
‘जय भीम’ अंतर्मनाला आत्मविश्वास देणारी शक्ती
By admin | Updated: April 17, 2016 00:39 IST