शासनाला पाठविला ठराव : शेतकऱ्यांना कर्जातून तत्काळ मुक्त कराचंद्रपूर : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींकडे सरकारने फिरविलेली पाठ, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेल्या आत्महत्या, नापिकीमुळे ग्रामीण भागात आलेले दारिद््रय अशा विविध प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जातून संपूर्ण मुक्तता करणे, शेती व्यवसाय आणि शेतकऱ्यांना संरक्षण देणे, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पोशिंदा म्हणून उदरनिवारहासाठी दरमहा पाच हजार रूपये पेन्शन मिळणे, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करणे आदी प्रश्नांसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. शेतमजूर कृती समिती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने किशोर माथनकर आणि शंकर धोंडगे हे शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेसाठी आवश्यक असलेले प्रपत्र पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांकडे आणि प्रमुख पदाधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या प्रपत्रांवर आपले नाव आणि पत्ता लिहून ते न्यायालयाच्या खंडपीठाकडे पाठवून हा लढा सामूहिक करावा, अशी विनंती जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी केली आहे. जिल्ह्यातील धान उत्पादकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यासाठी आंदोलने करून आणि मोर्चे काढून कसलीही दखल होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात पक्षाने जिल्ह्यात हे पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २६ नोव्हेंबरला सावलीतील विश्वशांती विद्यालयाच्या मैदानावर शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ठराव करून शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने ३ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्यात आला होता. मात्र सरकारने निर्णय न घेतल्याने न्यायालयात दाद मागणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची सरकारविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी
By admin | Updated: March 5, 2016 00:56 IST