रोहीत बोथरा मारहाण प्रकरण : कठोर कारवाईचे संकेतचंद्रपूर: येथील बहुचर्चित रोहीत बोथरा मारहाण प्रकरणाचा चौकशी अहवाल सोमवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या दालनात पोहचला. या एकूणच गंभीर प्रकरणात पोलिसांनी निरपराध रोहीतला बेदम मारहाण केल्याचे सिद्ध झाल्याने आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.३१ आॅगस्टच्या रात्री चिमूर येथून व्यवसायातील वसुली करून चंद्रपूरकडे परत येत असताना क्रमांक नसलेल्या वाहनातून आलेल्या विना गणवेशधारी पोलिसांनी त्याला बेशुद्ध होईस्तोवर मारहाण केली. दारू विक्रेता असल्याच्या केवळ शंकेवरून पोलिसांकडून इतकी बेदम मारहाण करण्याची गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच घटना असावी. या घटनेने संपूर्ण समाजमन ढवळून निघाले आहे. एका निरपराधाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या मस्तवाल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने शहरातून मोर्चाही काढण्यात आला. लोकप्रतिनिधींनीही पोलिसांच्या या वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला. एवढेच नव्हे तर काही संघटनांनी या प्रकरणी शहरात विविध ठिकाणी फलके लावून पोलिसांच्या कृतीचा तिव्र निषेध केला. प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी गेल्या चार दिवसांत या प्रकरणाचे विविध कंगोरे तपासले. संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांची बयाणे नोंदविली. जखमी रोहीतचेही बयाण नोंदविण्यात आले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी चौकशी अहवाल जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांच्याकडे सोपविला. सोमवारी रात्रीतूनच या प्रकरणी कारवाईची दिशा ठरणार असल्याची विश्वसनिय माहिती आहे. या प्रकरणात नेमकी काय कारवाई केली जाते, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये कमालिची उत्सुकता आहे. ही कारवाई कठोर स्वरूपाची असेल, असे संकेत पोलीस वर्तुळातूनच मिळत आहेत. (प्रतिनिधी)
चौकशी अहवाल पोलीस अधीक्षकांच्या दालनात
By admin | Updated: September 8, 2015 00:51 IST