राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. औषधी विक्रेता व कर्मचारी हे आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून २४ तास सेवा देत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत करण्यात मोठी मदत झाली. औषधी विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध हा कोरोना बाधित रुग्णांसोबत व त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांशी जवळून येतो. त्यामुळेे अनिष्ट परिणामाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र देशात २०० पेक्षा अधिक औषधी विक्रेते कोरोनाने बळी पडले. एक हजारच्या जवळपास कुटुंबातील नातेवाईक बाधित झाले. मात्र, केंद्र व राज्य सरकारने औदार्य दाखविले नाही. संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल शासनाने घेतली नाही. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला. चंद्रपूर जिल्ह्यातही असा निर्णय घेऊ, असेही चंद्रपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट- ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल एकरे, पदाधिकारी व सदस्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
औषधी विक्रेत्यांवर केंद्र व राज्य सरकारकडून अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST