प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : शालिनी ढोरे यांचा पत्रकार परिषदेत आरोपब्रह्मपुरी : तालुक्यातील उचली (कालेता) येथे ३० आॅगस्टला माझे पती शालिकराम ढोरे यांची गावालगत रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास हत्या करुन मारेकरी पसार झाले. ब्रह्मपुरी पोलिसांनी हे प्रकरण अपघात म्हणून नोंदविले आहे. तेव्हा माझ्या पतीचा अपघात झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली, आरोपींचा पोलिसांनी शोध घ्यावा. दडपलेले प्रकरण नव्याने चौकशी करुन गुन्हेगारांना अटक करण्याची करावी, अशी मागणी मृताची पत्नी शालिनी ढोरे यांनी पत्रकार परिषदेतून केली. माहिती देताना त्या म्हणाल्या, पती शालिकराम मिस्त्री काम करीत होते. यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू होता. मृत शालिकराम हे सकाळी काही कामानिमित्ताने धानोली (पवनी) येथे गेले होते. ते दुपारी परत आले. पुन्हा ३ ते ४ वाजताच्या दरम्यान काहालीला गेले व पुन्हा ब्रह्मपुरीला मुलांच्या दाखल्यासाठी गेले. नंतर ७ वाजता उचलीला घरी आले व लगेच कामानिमित्ताने काहालीला गेले. सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान उचली-काहाली मार्गावर शालिकराम आपल्या मोटरसायकलने प्रचार करणाऱ्या महिलांना पडलेले ेदिसले व मोठमोठ्याने वाचवा म्हणून ओरडत होते. लगेच मला माहिती मिळताच घटनास्थळ गाठून त्यांना ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने ते बेशुद्ध होते. त्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी नागपूरला हलविण्याचे सांगितल्याने नागपूर येथे नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे पत्नीने सांगितले.माझ्या पतीची हत्या नातेसंबंधातील व्यक्तीने केली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. परंतु मारेकऱ्यांनीच अपघात झाल्याची खोटी तक्रार ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला दिली होती. मी पतीच्या उपचारासाठी धडपडत असताना मारेकऱ्यांनीच खोटी तक्रार दिल्याने ब्रह्मपुरी पोलिसांनी हा प्रकार अपघात म्हणून बंद केला आहे. ज्यावेळेस ही घटना घडली, तेव्हा माझ्या पतीच्या दुचाकीचे साधे लाईट फूटले नव्हते, मारेकऱ्यांची सायकल तेथे नव्हती. परंतु दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पंचनामा केला असता मोटरसायकल व सायकलची तुटफूट असल्याचे दाखविण्यात आले आहे. अपघाताचा हा केवळ देखावा केला आहे, असे त्या म्हणाल्या.काही साक्षदाराचे बयाण ही हत्येच्या बाजूने नोंदविले असूनही तुमच्याकडे ठोस पुरावा नाही म्हणून हे प्रकरण ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक गुंडाळून हत्यारांना अभय देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी आहे. हत्याऱ्यांकडून मला व माझ्या कुटुंबांना धोका असून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करण्याची मागणी व न्याय न मिळाल्यास या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागणार असल्याचे शालिनी ढोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रपरिषदेला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पतीचा अपघात नसून हत्या केली
By admin | Updated: September 5, 2015 01:12 IST