वन विभागाची टोलवाटोलवी : सूर्यफुलाच्या संरक्षणासाठी मासेमारीचे जाळेचंद्रपूर : सूर्यफुलाचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मासे पकडण्याच्या जाळ्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असून यामुळे गेल्या महिन्याभरात विविध जातीच्या व दुर्मिळ अशा ५०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला. ही बाब वन विभागाने अद्यापही गांभिर्याने घेतली नसून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. यासंदर्भात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या निसर्ग सखा या संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांनी वन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतरही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने पक्ष्यांचे मृत्युसत्र अद्यापही सुरूच आहे. गोंडपिपरी तालुक्यात ५०० पेक्षा अधिक हेक्टरवर यंदा शेकडो शेतकऱ्यांनी सूर्यफुलांची लागवड केली आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडा, भंगाराम (तळोधी), तारसा, नवेगाव, नांदगाव, येनबोधला, तांडा खराटपेठ, सालेझरी, आदी गाव परिसरातील ७० ते ८० शेतांमध्ये शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली असून सूर्यफुलाच्या संरक्षणासाठी मासेमारी करण्याचे जाळे जमीनीपासून १५ फुट उंच बांबूच्या सह्यायाने पसरविले आहे. मागील महिन्यांपासून सूर्यफुल बियांवर आले आहे. सूर्यफुलाचे बी खाण्यासाठी संबंधित शेती परिसरात मोठ्या संख्येने पक्षी घिरट्या घालत असतात. पिकावर नॉयलनचे जाळे पसरविण्यात आल्याने त्यात हे नि:ष्पाप जीव अडकून मृत्युमुखी पडत आहे. त्यात शिखरा, गरुड, पोपट, वेडाराघू, रानचिमणी, लावा, कवडी, लालबुळ्या, बुलबुल, टिटवी, करकोचा, वटवाघूळ आदी पक्ष्यांचा समावेश आहे. ही बाब गोंडपिपरी येथील निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांना माहिती होताच, त्यांनी ६ मार्च रोजी विठ्ठलवाडा परिसरातील नानाजी पुप्पलवार, संतोष कुंदोजवार, पोतराजे, गणपती वाग्दरकर यांच्या शेताची पाहणी केली असता, या शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या जाळ्यामध्ये विविध जातीचे ४७ पक्षी मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वांढरे यांनी यासंदर्भात मध्य चांदा वन विभागाचे डीएफो गजेंद्र हिरे यांना दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच संबंधिक कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर जाण्याचे फर्मानही सोडले. परंतु अद्यापही पिकावर लावलेले जीवघेणे जाळे काढण्यात आले नाहीत. (प्रतिनिधी)
जाळ्यात अडकून शेकडो पाखरांचा मृत्यू
By admin | Updated: March 9, 2016 01:56 IST