कॉंग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनचंद्रपूर : मागील काही दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.विशेषत: चद्रपूर तालुक्यातील ताडाळी, मोरवा, साखरवाही, शेगाव, बेलसनी, वढा, सोनेगाव, उसगाव, पांढरकवडा, धानोरा पिपरी, वेंढली, मारडा, सिदूर, चारगाव, देवाडा आदी गावांमधील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या अकाली आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसला असल्याने शेतकऱ्यांचे ऐन हाती येणारे पीकही गेले. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या भागाचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशा मागणीचे निवेदन चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे शहर सचिव महेश मेंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषीमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मार्फतीने पाठविले आहे. चंद्रपूर तालुक्यात जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जाते. पावसाळ्यात होणाऱ्या खरीप पीकांनाही यावर्षी फटका बसला. अगोदरच कर्जबाजारी असलेला शेतकरी कसाबसा रब्बी पीक घेण्याच्या तयारीत असताना पुन्हा निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतात आलेले पीक पावसाने हिरावले तर डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या मदतीची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन महेश मेंढे यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांना देण्यात आले. शिष्टमंडळात किसान खेत मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोखारे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे महेश मेंढे, प्रभाकर ताजने, चंद्रपूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष नागेश बोंडे, घुग्घुस ग्रामपंचायतीचे सदस्य पवन आगदारी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे रोशन रामटेके, बबलु सातपुते, सचिन कत्याल, सचिन रणवीर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या
By admin | Updated: March 8, 2016 00:44 IST