भद्रावती : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरींचे बांधकाम पूर्ण केले आहे. शासनाने विहिरींसाठी अनुदान जाहीर केले होते; मात्र अद्यापही अनुदान मिळाले नसल्याची ओरड आहे.
खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता
राजोली : गावातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत अहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
ग्रामसभेसाठी जनजागृती करणे गरजेचे
ब्रह्मपुरी : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेला ग्रामस्थ अनेकवेळा पाठ फिरवतात. त्यामुळे गावातील निर्णय त्यांना माहीतच पडत नाहीत. ग्रामीण भागामध्ये ग्रामसभेसाठी जनजागृती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने केली जात आहे.
वजनाच्या नावाखाली दगडांचा वापर
जिवती : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे. पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे अशी लूट सुरू असून, वजन म्हणून तेवढ्या वजनाचे दगड दिसून येतात. यात अनेकदा ग्राहकांची फसगत होत आहे.
जात प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित
जिवती : तालुक्यातील काही नागरिक मागील ४० ते ५० वर्षांपासून या ठिकाणी राहतात; मात्र अद्यापही अनेकांकडे जात प्रमाणपत्र नाही. प्रमाणपत्र मिळावे, यासाठी कागदपत्रांसह अर्ज सादर केले. मात्र, प्रकरणांचा निपटारा झाला नाही.
महामार्ग बनले मृत्यूमार्ग
कोरपना : तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्यांवाचून नाही. या मार्गावरून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हिरापूर मार्गावरील खड्डे धोकादायक
नांदाफाटा : नांदाफाटा ते वणीकडे जाणाऱ्या आवारपूर-हिरापूर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. रस्त्याच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
प्लास्टिक पिशव्यांना आळा घाला
राजुरा : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात़. या पिशव्या कुठेही टाकून देण्याचे प्रकार वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे़.
एटीएममध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करावे
वरोरा : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभसुद्धा घेत आहे. मात्र काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही धोका झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.
धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावले
भद्रावती : माजरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जात आहे. अनेक वाहने उघड्यावर कोळशाची वाहतूक करीत असल्याने या रस्त्यावर कोळशाच्या धुळीचा थर साचतो. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून, अनेकांना श्वसनाचा आजारही जडला आहे. त्यामुळे कोळसा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.