अंतरराज्यीय मार्ग बनला खड्डेमय : २४ किलोमीटर अंतरात हजारो खड्डेराजुरा : राजुरा तालुका राज्याच्या शेवटच्या टोकावर आहे. या तालुक्यातील राजुरा ते लक्कडकोट मार्गाने दक्षिणेकडील राज्यात जाणारी अंतरराज्यीय वाहतूक सुरू आहे. या मार्गाच्या मजबुतीकरणासाठी दबलेला रस्ता खोदून ‘पॅसेज’ भरण्यात आले होते. पावसाच्या पहिल्याच झटक्यात पॅसेज उखडून मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन २४ कि.मी. अंतर पार करण्याकरिता दोन तास लागत आहे. अशी गंभीर अवस्था अंतरराज्यीय मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता व कंत्राटदार यांच्या निष्क्रीयतेमुळे झाली आहे. राजुरा ते लक्कडकोट या अंतरराज्यीय मार्गाने दररोज हजारो ट्रक व इतर वाहने जाणे येणे करतात. याच मार्गाने दक्षिणेकडील तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरल या राज्याकडे जाण्यासाठी हाच मार्ग जवळचा असल्यामुळे वाहनाची सतत वर्दळ असते. या मार्गाला लागून तेलंगणा राज्याची सीमा आहे. त्या बाजुने येणारे वाहन १०० कि.मी. वेगाने येतात. महाराष्ट्राच्या लक्कडकोट सीमेवर येताच दोन फुट खोल खड्डे व पुर्णपणे उखडलेला रस्ता पाहून वाहनचालक विचलित होऊन खड्डयाचा बचाव करताना वाहन इकडेतिकडे फसत आहे.या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला व त्याचे मोठ्या उत्साहात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले. भूमिपूजनप्रसंगी ना. अहीर यांनी या अंतरराज्यीय मार्गाचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे व मुदतीच्या आत करण्यात यावे, अशी सुचना दिली होती. परंतु कंत्राटदारास राजकीय पाठबळ असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता निष्क्रीय होऊन मर्जीनुसार बांधकाम सुरू आहे. हे वाहन चालकाचे दुर्दैव आहे.राजुरा ते लक्कडकोट हा मार्ग २४ कि.मी. चा असून या रस्त्यावर अंदाजे पाच हजाराहून अधिक खड्डे पडले आहे. बऱ्याच ठिकाणी अंदाजे १० मिटर रस्ता उखडून रस्त्याचे अस्तित्व नाहिसे झाले आहे. मजबुतीकरणासाठी बऱ्याच ठिकाणी बदलेला रस्ता खोदून डांबरीकरणाचे पॅसेज भरण्यात आले. नेमके तेच पॅसेज उखडून गेले आहे. त्यामुळे पॅसेज भरण्याचे कार्य निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे म्हटले जात असून त्याची गुणवत्ता नियंत्रकाकडून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.या मार्गाची दुर्दशा भयंकर स्वरुपाची असून त्याची दुरुस्तीसुद्धा केली जात नाही. त्यामुळे पावसात खड्डयात पाणी साचून वाहन चालकास त्याचा अंदाज येत नाही. त्याचा परिणाम वाहन चालकास अपघाताच्या माध्यमातून सोसावा लागत आहे. सध्याच्या स्थितीत या मार्गाने ताशी १० कि.मी. वेगाने वाहन चालवू शकत नाही. खड्डे वाचविताना मागून येणाऱ्या वाहनाची धडक बसते. अपघातामुळे या मार्गावर बऱ्याच ठिकाणी काचेचा सडा पडून दिसतो. वाहन फसण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.शासनाने निधी उपलब्ध करून देऊनसुद्धा मजबुतीकरणाचे काम मुदतीच्या आत केली जात नाही. हे येथील कार्यरत अभियंत्यांची निष्क्रीयता आहे. असे असले तरी कंत्राटदारास पॅसेजच्या कामाची रक्कम अदा करून कार्यकुशलता दाखविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
अभियंता व कंत्राटदाराच्या निष्क्रीयतेमुळे शासनाची नाचक्की
By admin | Updated: September 30, 2016 01:09 IST