राजेंद्रसिंग यांचे मनोगत : रिव्हर आणि सिव्हर वेगळे ठेवाचंद्रपूर : नदी व समाजाचे अतुट नाते असून मृतावस्थेत गेलेल्या इरई नदीला शासन व प्रशासनाने जिवंत करण्याचे अभिनंदनीय काम केले आहे. कारखान्याची राख व ओव्हर बर्डनमुळे लुप्त पावलेली इरई नव्याने पुनर्जन्म घेत आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे प्रसिध्द जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंग यांनी सांगितले. शनिवारी पडोली, दाताळा व चौराळा या ठिकाणी प्रशासनाने सुरु केलेल्या इरई पुनरुज्जीवन कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणी डॉ. राजेंद्रसिंग यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, तहसीलदार संतोष खांडरे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी हजर होते.दुर्गापूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामधील राख व ओव्हर बर्डनमुळे इरईचा मूळ प्रवाह बदलला होता. यामुळे इरईचे मुळ रुप नष्ट होण्याच्या मार्गावर असतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन राबविलेला इरई पुनरुज्जीवन कार्यक्रम कौतुकास पात्र असल्याचे राजेंद्र्रसिंग यांनी सांगितले.इरईचे सुरु असलेले काम पाहून राजेंद्रसिंग यांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनातर्फे सुरु असलेले काम योग्य दिशेने व इरई पुनरुज्जीवन होण्याच्या अनुषंगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. नदी आपल्या पूर्वीच्या प्रवाहाप्रमाणे वाहू शकेल, याचे या कार्यक्रमात भान ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नदीच्या आरोग्याची दक्षता घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. रेती हे नदीचे आरोग्य असते असे नमूद करुन राजेंद्रसिंग म्हणाले की, खोलीकरणाचे काम रेती लागेपर्यंतच करण्यात आले ही बाब अतिशय चांगली आहे. कारण रेती नदीतील पाण्याला शुध्द करत असते याबाबीचे प्रशासनाने खास लक्ष ठेवल्याचे त्यांनी सांगितले. इरई पुनरुज्जीवित करीत असताना खोलीकरणाचा स्तर रेतीच्या स्तरापर्यंतच आणावा व नदीमध्ये डोह तयार होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)
शासन प्रशासनाने इरई नदीला जिवंत केले
By admin | Updated: May 9, 2016 00:54 IST