अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरशिक्षण सर्वांना मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, याचा कायदाही करण्यात आला. मात्र ज्या शाळेची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे, अशा सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जवळच्या शाळेत स्थलांतरित केले जाणार आहे. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना बसणार असून त्या बंद होण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत. यामुळे शिक्षकही अतिरिक्त ठरणार आहेत.चारवट शाळेत केवळ सहा विद्यार्थीबल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत एकूण २८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. यातील विसापूर केंद्रातील चारवट येथील शाळेत पहिल्या वर्गात शून्य, दुसऱ्या वर्गात एक, तिसऱ्या वर्गात दोन तर चवथ्या वर्गात तीन असे एकूण सहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत दोन शिक्षक सहा विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. तालुक्यातील बामणी केंद्रातील असेगाव १५, कोर्टिमक्ता १८, कोर्टितुकूम १६, कोठारी केंद्रातील काटवली (बामणी) १९. काटवली २० व विसापूर केंद्रातील चारवट ६ व विद्युत केंद्र जिल्हा परिषद शाळेत १० विद्यार्थी आहेत. तालुक्यात सात शाळेत पटसंख्या कमी असल्याने आगामी शैक्षणिक सत्रापासून या शाळा कुलूपबंद होण्याच्या मार्गावर आहेत.राजुऱ्यात ४९ शाळेवर अवकळाराजुरा तालुक्यात एकूण जिल्हा परिषद शाळेपैकी तब्बल ४९ शाळेची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील विरुर स्टेशन केंद्रातील १०, अहेरी केंद्रातील ७, देवाडा केंद्रातील ६, भेंडवी केंद्रातील ३, पांढरपवनी केंद्रातील ४, मानोली केंद्रातील ३, साखरी केंद्रातील ६, सास्ती केंद्रातील ३, नलफडी केंद्रातील २ तर राजुरा येथील तेलगू शाळा आणि टेंबुरवाही केंद्रातील ४ अशा एकूण ४९ प्राथमिक शाळेची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. परिणामी शिक्षण विभाग धास्तावला असून शाळेचे दार बंद झाल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेचा प्रश्न गंभीर वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्य शासनाचा शिक्षण विभाग ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून गाव तेथे शाळा उपक्रम राबवीत आहे. दुर्गम व आदिवासी भागात शिक्षण पोहोचविण्याचा भरपूर प्रयत्न करीत आहे. मात्र आजघडीला गाव खेड्यापर्यंत कायम विनाअनुदानीत तत्वावर इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरु केल्याने मराठी माध्यमाच्या शाळेवर अवकळा ओढवली आहे. परिणामी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस खालावत आहे. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढली म्हणून सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजना, शालेय गणवेश, मध्यान्ह भोजन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मुलींना उपस्थिती भत्ता आदी योजनावर करोडो रुपयाचा खर्च करीत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १ हजार ५७२ इतक्या आहेत. यातील ४०० च्या आसपास शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० च्या आत आहे. यामुळे शासनाचा शालेय शिक्षण विभाग अशा शाळांना कुलूप लावण्याचा गंभीर विचार करीत आहे. तेथील शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वाहनाद्वारे जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेत आहे. शाळा बंद करण्याचा विपरित परिणाम कार्यरत शिक्षकांवर होणार असून शिक्षकही अतिरिक्त श्रेणीत येणार आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने शिक्षकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून गाव तिथे शाळा शिक्षण विभागाचे सामाजिक न्यायचे धोरण आहे. त्यामुळे आदिवासी पाडे, दुर्गम ठिकाणच्या वस्त्या, तांडे आदी ठिकाणी प्राथमिक शाळा सुरु करण्यात आल्या. अशा ठिकाणची लोकसंख्या मुळातच कमी असल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्याही खालावली आहे. आदिवासी व कमकुवत घटकातील विद्यार्थी अशा शाळेत शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. परंतु ज्या शाळांची पटसंख्या २० च्या आत आहे, त्या शाळा बंद होतील. विद्यार्थी कमी असले तरी शिक्षण अशा गावापर्यंत पोहचत होते. मात्र त्याचा प्रवाह बंद होऊन गरजू विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.
जिल्हा परिषद शाळांवर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 00:35 IST