फोटो
चंद्रपूर : प्रत्येक गावात प्रवास करण्याकरिता गोरगरिबांसाठी जीवनवाहिनी लाल परी महत्त्वाची असते. त्या माध्यमातून प्रवास केला जातो; परंतु वाहक व चालक हे कमी पगारावर सेवा देत असतात. त्यामुळे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर सहा महिने मोफत पास दिला जातो. त्याच धर्तीवर मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला एक महिन्याचा पास न देता सहा महिन्यांचा पास देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. लवकरच असा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री परब यांनी यावेळी दिली. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लाभ होणार आहे.
राज्यातील प्रवासी जीवनवाहिनी असलेल्या लाल परीचे कर्मचारी कुटुंबापासून दूर राहून सेवा देत असतात. सेवा देत असताना त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असते. कुटुंबाला ते वेळ देऊ शकत नाहीत. एस.टी. कर्मचाऱ्यांना पगार कमी असल्यामुळे घरखर्च, घरभाडे, वीज बिल, किराणा सामान, पाल्यांचे शिक्षण, आदी खर्च करताना त्यांची कसरत होते; परंतु ते आपला कुटुंबाचा गाडा चालवीत असतात, याकडेही आमदार धानोरकर यांनी परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधले.