मुख्य रस्ता घाणीने बरबटलेला : ताडोबाच्या प्रवेशद्वाराचे वास्तवराजकुमार चुनारकर खडसंगीजगात वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारीव्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी चिमूर तालुक्यातील कोलारा गावातून देश- विदेशातील पर्यटक येतात. देशात भारत स्वच्छ अभियान सुरू असताना चिमूर तालुक्यातील कोलारा गावाला मात्र स्वच्छतेचा विसर पडल्याचा प्रत्यय ताडोबाच्या भ्रमंतीसाठी येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटक तथा अतिविशिष्ट पर्यटकांना येत आहे. या मार्गाने ताबोडात प्रवेश करणाऱ्या विदेशी पर्यटकांना अक्षरश: हागणादारीतून वाट काढावी लागत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहचली आहे. या व्याघ्र प्रकल्पात हमखास वाघाचे दर्शन होते. त्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्यासाठी महिन्याकाठी हजारो पर्यटक येतात. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, करांडला तथा वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पामुळे शासनाने नागपूरला टायगर कॅपीटल घोषित केले आहे.देश-विदेशातील पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी नागपूर शहरातून चंद्रपूर जिल्ह्यातूनच प्रवेश करावा लागतो. या प्रकल्पात जाण्यासाठी मोहर्ली गेट, नवेगाव गेट, कोलारा गेट व खुटवडा गेटवरुन जाता येते. यांपैकी मोहर्ली व कोलारा गेटवर पर्यटकांची अधिक पसंती आहे. त्यामुळे कोलारागेटवर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात.चिमूर तालुक्यातील कोलारा गावात नऊ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. या गावाची लोकसंख्या साधारण दोन ते तीन हजारांच्या आत आहे. गावाच्या सभोवताल ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोअर झोनचे जंगल लागले आहे., तर गाव मात्र पूर्ण वनविभागाच्या बफर झोनमध्ये वसले आहे. या गावात शिक्षणासाठी जिल्हा परिषदेची इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी चिमूरला जावे लागते. गावामध्ये मासळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र तथा फिरत पथक आहे. मात्र हे उपकेंद्र व फिरते पथक अनेक दिवसापासून आजारी पडले आहे. मात्र या समस्येसह गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे या जंगलव्याप्त गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.शासनाच्या हागणदारी मुक्त योजनेअंतर्गत या गावात काही प्रमाणात शौचालय तयार करण्यात आलेत. तसेच इंदिरा आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार ८५ टक्के शौचालय आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर अत्यल्प प्रमाणात असल्याचे वास्तव आहे. गावातील अनेक महिला व नागरिक शौचाससाठी उघड्यावरच जातात. त्यामुळे गावाच्या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूने हागणदारी निर्माण झाली आहे. तसेच गावात शेती व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांच्या खताचे खड्डे रस्त्याच्या दोन्ही बाजूने असल्याने खतामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे.स्वच्छ भारत मिशनचा स्थानिक ग्रामपंचायत तथा तालुका प्रशासनाला विसर पडल्याने कोलारा तोडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या देश- विदेशातील पर्यटकांना कोलारा गावातील वास्तव नजरेसमोर येत मोठ्या प्रमाणात हागणदारीचा सामना करावा लागत आहे. यातून पर्यटकांमध्ये काय संदेश जात असेल, याचा विचार करून स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
विदेशी पर्यटकांना काढावी लागते हागणदारीतून वाट
By admin | Updated: December 2, 2015 00:47 IST