चंद्रपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार चंद्रपूर शहरात शुक्रवार रात्री ८ वाजतापासून शनिवार आणि रविवार या दोन दिवसाकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दोन दिवसात शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत मोडणारी सर्व दुकाने चालू राहतील. मात्र सर्वसामान्य व्यक्तींना शहरात फिरता येणार नाही. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर संचारबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत. शुक्रवार रात्री ८ वाजतापासून शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, पोलीस विभागामार्फत शहरात तपासणी होणार असून, तपासणीच्या वेळी योग्य ते कारण असेल तरच आपल्याला सोडले जाईल, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने नागरिकांना घरीच सुरक्षित राहण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. शनिवार व रविवारी संचारबंदी असताना चंद्रपूर शहर परिसरात अत्यावश्यक सेवेमध्ये मुभा देण्यात आलेल्या दुकानदार, रिक्षा चालक, डिलिव्हरी बॉय, कारखानदार येथील काम करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
संबंधित अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या मालक आणि कर्मचाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतल्याचे प्रमाणपत्र आपल्या दुकानात लावणे बंधनकारक आहे. निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर त्यांच्यावर शासनाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली आहे.
शुक्रवार रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली असून, त्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, बाकी सर्व बंद असणार आहे. तसेच नागरिकांनी कारण असेल तरच बाहेर पडा कारण नसेल तर घरी थांबा, विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.