घनश्याम नवघडे ल्ल नागभीडयावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यातच सूर्य आग ओकत आहे. परिणामी नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडत आहे. या वातावरणात जंगलातील पशुपक्ष्यांची चांगलीच परवड होत आहे. ही परवड थांबावी, यासाठी येथील ‘झेप’ या निसर्ग संस्थेने जंगलातील मृत पाणवठे शोधून ते जिवंत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. झेपच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.नागभीड तालुका जंगलव्याप्त आहे. या तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणावर असल्याने पशुपक्ष्यांची संख्याही भरपूर आहे. गेल्या काही वर्षात जंगली श्वापद आणि मानवी संघर्षाच्या अनेक घटनासुद्धा घडल्या आहेत. याला विविध कारणे असली तरी उन्हाळ्याच्या दिवसात हे संघर्ष होण्यास ‘पाणी’ हे एक प्रमुख कारण आहे.या पशुपक्ष्यांना जंगलाच पाणी उपलब्ध व्हावे. त्यांची पाण्यासाठी परवड होऊ नये, यासाठी येथील झेप ही निसर्ग संस्था पुढे सरसावली आहे. येथील वनविभागाच्या सहकार्याने जंगलातील जुने साठे शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसात अस्वल ज्या ठिकाणी बसून आराम करते, अश्या जागा शोधून त्या ठिकाणी काही फुट जागा खोदून पाणवठे तयार करीत आहेत.आतापर्यंत या निसर्ग संस्थेने नागभीड तालुक्यातील जंगल परिसरात अनेक ठिकाणी असे पाणवठे श्रमदानातून तयार केले आहेत. झेप या निसर्ग संस्थेने आजवर अनेक उपक्रमे राबविली. पण जंगली पशुपक्ष्यांसाठी मृत पाणवठे शोधून ते जिवंत करण्याच्या या उपक्रमांची खरोखरच प्रशंसा होत आहे. ‘झेप’चे अध्यक्ष पवन नागरे, उपाध्यक्ष अमोल वानखेडे, सचिव अमित देशमुख, समीर भोयर, नरेंद्र लोहबरे, वीरेंद्र गजभे, आशिष कुमरे, सतीश चारथड, अभिजित गोहणे या झेपच्या कार्यकर्त्यांनी या कामी स्वत:ला वाहून घेतले आहे.उन्हाळ्याच्या दिवसात अस्वल ज्या ठिकाणी बसते. त्या खाली पाणी साठा निश्चित असतो असा परंपरागत समज आहे. असे ठिकाण आम्ही शोधून काढले व त्या ठिकाणी काही फूट जागा खोदली. खरोखरच त्या ठिकणी पाणी लागले. या कामी आम्हाला वनविभागाचेही सहकार्य लाभले.- अमित देशमुख, उपाध्यक्ष ‘झेप’ निसर्ग संस्था, नागभीड
मृत पाणवठे शोधून ते जिवंत करण्यासाठी ‘झेप’ची धडपड
By admin | Updated: April 18, 2016 01:06 IST