पंचायत राज दिन : केंद्र सरकारचा बल्लारपूर पंचायत समितीला बहुमानबल्लारपूर : चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर पंचायत समितीमधील लावारी ग्रामपंचायतीने नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिली. याबद्दल केंद्र सरकारच्या पंचायत मंत्रालयाच्या वतीने पंचायत राज दिनाचे औचित्य साधून येथील कार्यक्रमात लावारी येथील सरपंच वैशाली पोतराजे व उपसरपंच धीरज निरंजने यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून रविवारी सत्कार करण्यात आला. लावारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र सरकारचा बहुमान बल्लारपूर पंचायत समितीला मिळाला आहे.ग्राम विकासाला चालना देण्यासाठी लावारी ग्रामपंचायतीने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. भारत निर्माण कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा दिली. ग्रामपंचायत स्तरावरील कारभार आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून परिणामकारक केंद्र सुरू केले. ग्रामसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक दाखले व प्रमाणपत्र संगणिकृत देण्याचे धोरण आखण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शिकता निर्माण होण्यास मदत मिळाली. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट कार्य लोकसहभागातून ग्रामपंचायतीने केले. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने येथील ग्रामपंचायतीच्या कामाची दखल घेतली. पंचायत राज संस्था स्तरावर पारदर्शकता निर्माण करून कामकाजाचे सशस्तीकरण करण्यास मोलाचे योगदान दिले. राज्यातील ५७.६ टक्के ग्रामीण भागातील जनतेला प्रेरणादायी ठरणारा उपक्रम ग्रामपंचायतीने राबविला. ग्रामपंचायतीची ग्राम विकासातल्या महत्त्वाच्या भूमिकेला अनुसरुन बल्लारपूर पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, लावारी येथील सरपंच वैशाली योगेश पोतराजे, उपसरपंच धीरज निरंजने, ग्रामसेवक वर्षा मानकर यांचा केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करुन गौरव केला आहे. हागणदारीमुक्त अभियानात राज्य स्तरावर तर पंचायत राज संस्था स्तरावर केंद्र सरकारतर्फे हा बहुमान मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)
लावारी येथील सरपंच व उपसरपंचांचा सत्कार
By admin | Updated: April 27, 2016 00:55 IST