शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : शेतशिवारात सुविधाविना शाळा-महाविद्यालयेराजोली : राजोली परिसरात विविध शाळा, महाविद्यालयांनी नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले असून विद्यार्थ्यांनी आपल्याच संस्थेत प्रवेश घ्यावा, यासाठी निरनिराळे फंडे उपयोगात आणत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. शाळा-महाविद्यालयातील गळती थांबविण्यासाठी आणि तुकड्या टिकविण्यासाठी पटसंख्येत वाढ होणे गरजेचे असून त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरु नयेत, यासाठी काही शाळा व महाविद्यालये विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहेत. यासाठी नवी अभ्यासक्रमे सुरू करून त्यांना प्रवेश घेताना सोयी सवलतीची प्रलोभने देताना दिसत आहेत. प्रशस्त इमारत, भव्य पटांगण, अनुभवी प्राध्यापक वर्ग, अशा प्रलोभनाद्वारे या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना सर्रास आकर्षित करीत असून शिक्षण विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. कित्येक शाळा, महाविद्यालये गावा बाहेरील शेतशिवारात सुरू असून विद्यार्थ्यांना कुठल्याही भौतिक सुविधा पुरविण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. गावातील शिक्षक बेरोजगारांना हाताशी धरुन त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिकविले जाते. या मोबदल्यात त्यांना तुटपुंजे मानधन देण्यात येत असून स्थायी पदावर नेमणूक करताना त्यांना डावलले जात आहे. गावाबाहेर असलेल्या या शैक्षणिक इमारतींना सुरक्षा भिंतीच नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न निर्माण होत आहे. काही शाळांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून सुरक्षा भिंत बांधकामाचे अनुदान सुद्धा प्राप्त केले. परंतु, अजुनही सुरक्षा भिंत उभी झालीच नसल्याची माहिती असून शिक्षण विभाग मात्र याकडे कानाडोळा करून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
शिक्षकांना वाचविण्यासाठी शैक्षणिक संस्थांची धडपड
By admin | Updated: July 22, 2015 01:33 IST