ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळ योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या; परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामीण नागरिकांनी पाण्यासाठी भटकावे लागत आहे. नळ योजना सुरू करून दिलासा द्यावा.
वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
भद्रावती : काही वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक जण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने शहरातील काही भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
सार्वजनिक शौचालयाकडे दुर्लक्ष
गोंडपिपरी : शहर स्वच्छ व हगणदारीमुक्त करण्यासाठी नगरपंचायततर्फे शहरात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले. मात्र याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी दुर्गंधी पसरली आहे. अनेकदा नगरसेवकांना सांगूनही स्वच्छता करण्यात आली नाही.
वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना त्रास
सिंदेवाही : सध्या वन्यप्राणी जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये शिरकाव करीत आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. बिबटे गावात येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवितात. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
लांब अंतरावरील बसफेऱ्यांची मागणी
जिवती : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती येथून लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याची मागणी केली जात आहे. जिवती येथून यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अहेरी, चिमूर, ब्रह्मपुरी, नांदेड, लातूर, केरीमेरी, आदिलाबादमार्गे कोरपना अशा बसेस सोडण्याची मागणी केली जात आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढला
घुग्घुस : पडोली तसेच अन्य पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. याशिवाय कर्मचारी कमी असल्याने कामातही विलंब होत आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी आहे.
अल्प उत्पादनाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
नागभीड : परिसरात मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्यावर अनेक संकटे कोसळली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाने विविध योजना राबवून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील धान उत्पादकांकडून करण्यात आली आहे.
सिमेंट रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदार हैराण आहेत. काही कामे कासवगतीने सुरू आहेत. निधी देण्याची मागणी केली जात आहे.
बेरोजगारांना हवा आर्थिक आधार
वरोरा : तालुक्यात बेरोजगारांची संख्या अधिक असून, त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी सामाजिक संस्थेचे बेरोजगार मेळावा आयोजित करून प्रशिक्षण दिले होते. दरम्यान खाणीमध्ये काही कामगार कामाला जातात, मात्र त्यांच्या पाल्यांना काम नाही.
शौचालयाअभावी नागरिकांची गैरसोय
कोरपना : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांत शौचालयाची व्यवस्थाच नाही. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालयांत नेहमीच अस्वच्छता दिसून येते. याचा परिणाम आरोग्यावरही होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बाखर्डी : औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त
सावली : तालुक्यातील बहुतांश गावांत इंटरनेट सेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत रहावे लागते.