राजीव जैन यांचे मनोगत : कार्यकाळ आनंदाचा चंद्रपूर : या जिल्ह्यातील नागरिकांची सामंजस्याची मानसिकता आणि सहकार्याची भावना यामुळे आपणास तीन वर्षे काम करताना कसलाही त्रास झाला नाही. नागरिकांच्या सौहार्दपूर्ण भावनेमुळेच पोलीस खात्यातील सर्वच जबाबदाऱ्यांना न्याय देऊ शकलो, असे भावोद्गार राजीव जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत काढले.तब्बल तीन वर्षांचा आपला प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण करून जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांची येथून बदली झाली आहे. शनिवारी त्यांनी आपल्या पदाची सुत्रे नवे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांच्यांकडे सोपविली. पदभार सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या कक्षात निवांतपणे त्यांनी गप्पा मारल्या. ते म्हणाले, आपण जिल्ह्यात या पदावर सर्वाधिक कार्यकाळ उपभोगणारे ठरलो आहोत. जिल्ह्यातील वातावरण शांततापूर्ण असल्याने काम करताना कसलाही त्रास झाला नाही. विधानसभा, लोकसभा निवडणुकाही शांतपणे पार पाडता आल्या. या काळात नागरिकांनी सहकार्य केल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली नाही. आठवणीत राहील असा तपास कोणता यावर ते म्हणाले, वरोरा तालुक्यातील माढेळी येथील ४० लाख रूपयांचे दरोड्याचे प्रकरण तपासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरले. आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेले होते. केवळ एका धाग्यावरून चमू उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील गावात पोहचली. गावातील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये फायरिंग सुरू असताना जीवाची पर्वा न करता आरोपीला घरातून पकडण्यात यश आले. दुसरा आठवणीतील तपास ब्रह्मपुरी शहरात बालिकेच्या अपहरणाचा आहे. अगदी काही तासातच आरोपीचा छडा लावून त्याला छत्तीसगडमध्ये अटक करण्यात आली. आरोपीच्या मोबाईलवरून त्याचा माग काढता आला. त्यामुळे अगदी रेल्वे स्थानकावरच तो हाती लागला. या सोबतच अनेक घटनांमध्येही तपास करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. वरोरातील गणेश विसर्जन दरवर्षी गाजायचे. मात्र तेथील परिस्थिती नियंत्रणात आणून शांतता प्रस्थापित करण्यात यश आले. अर्थात हे सर्व यश सहकाऱ्यांच्या मेहनतीने साध्य करता आले. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच खात्यातील अन्य जबाबदाऱ्याही सांभाळता आल्या. यातूनच पोलीस कल्याण निधीतून उपक्रम, वाचनालय, शाळा उभारणी करता आली. याचे श्रेय जिल्ह्यातील जनतेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दारूबंदीचे आव्हाण पेलण्यासाठी मनुष्यबळ हवेदारूबंदीवर प्रतिक्रिया विचारली असता राजीव जैन म्हणाले, निर्णय नक्कीच चांगला आहे. जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत आहे. मात्र दारूबंदी राबविताना पोलीस खात्यावर ताण पडत आहे. दारूबंदीसाठी जिल्ह्यात १४ पॉर्इंट ठरविण्यात आले असून त्या ठिकाणी ७२ पोलीस कर्मचारी गुंतले आहेत. कायदा सुुव्यवस्था राखण्यासाठी असलेले मनुष्यबळ दारूबंदीच्या कामात गुतंले आहे. त्यासाठी वेगळा स्टॉफ मिळण्याची गरज आहे. एक्साईजकडे ही जबाबदारी दिल्यास दारूबंदीच्या कारवाईचे नियोजन अधिक उत्तम रितीने करता येईल.
सौहार्दपूर्ण वातावरणामुळेच जबाबदाऱ्यांना न्याय देता आला
By admin | Updated: May 17, 2015 01:32 IST