पळवापळवी सुरु : गटागटाने सदस्य गेले विविध ठिकाणी देवदर्शनालासाईनाथ कुचनकार - चंद्रपूरपळवापळवीच्या राजकारणामध्ये यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे जाते याकडे सर्वसामान्यांसह राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. कांँग्रेस सत्ता स्थापन्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेऊन तसेच भाजपाच्या नाराज सदस्यांना आपल्या तंबुत आणण्याच्या प्रयत्नात आहे. तर, दुसरीकडे भाजपाही राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, युवाशक्तीच्या जोरावर सत्ता स्थापन्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तडतोड करण्याच्या मनस्थितीत आहे. काँग्रेस किंवा भाजपाला सत्तेत येण्यासाठी इतरांची मदत घेणे गरजेचे आहे. असे असले तरी, कांँग्रेस, राष्ट्रवादी, आणि भाजपाकडून विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील येथील चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र जिल्हा परिषद सदस्य ‘नॉर्ट रिचेबल’ असून बहुतांश सदस्य देवदर्शनाला गेले आहे.२१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. यावेळी अध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव आहे. त्यामुळे रस्सीखेच सुरु आहे. सहलीला गेलेल्या सदस्यांशी येथील नेते सतत संपर्कात असून पूर्णवेळ त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे, यावेळी जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसने आपली सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी सर्व गटांना एकत्र आणण्याचे काम माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांच्या मार्गदर्शनातून सुरु आहे. मामुलकर यांच्या मार्गदर्शनात यावेळी जिल्हा परिषदेमध्ये काँगेसची सत्ता स्थापन करतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २९ सदस्यांची गरज आहे. काँग्रेसकडे २१ सदस्य आहे. तर, राष्ट्रवादीकडे सात सदस्य आहे. दोन्हींची संख्या मिळविली तरीही बहुमत प्राप्त होत नाही. त्यामुळे आणखी एका उमेदवाराची गरज आहे. त्यामुळे शेतकरी संघटना किंवा मनसेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे प्रयत्नशील आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस तडजोड करण्यास तयार असून वेळप्रसंगी अध्यक्षपद इतरांकडे देऊन सभापतीपदावर समाधान मानण्यास तयार होऊ शकते. राष्ट्रवादी कांँग्रेसकडे अध्यक्षपदासाठी उमेदवारच नसल्याने त्यांना उपाध्यक्ष किंवा सभापतीपदावर समाधान मानावे लागणार आहे. जर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मनसेने युती केल्यास अध्यक्षपदाचा लाभ मनसेला मिळू शकते, असेही राजकीय वर्तूळात बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे, भाजपाचा एक गट काँग्रेस सदस्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे या गटासोबत जर तडजोड झाल्यास चित्र वेगळेच राहणार आहे. त्यामुळे बहुतांश सदस्य आपआपल्या गटागटाने देवदर्शनाला गेले आहे. तर काही सदस्य मुंबईत तळ ठोकून बसून आहे.विधानसभेची निवडणूक लक्षात घेता भाजपाने जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु केला आहे. भाजपाने पूर्वीसारखीच तडजोड करून अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्याच्या मनस्थितीत आहे. सदस्यांना देवदर्शनाला घेऊन जाण्याची जबाबदारीही एकाकडे दिल्यासे समजते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य भाजपाच्या संपर्कात असून वेळप्रसंगी ते आपली वेगळी चूल मांडणार असेही बोलल्या जात आहे. नुकतीच पंचायत समितीची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये एक-दोन ठिकाणी बहुमत असतानाही आरक्षणाचा फटला भाजपला बसला आहे. तर, चंद्रपूर पंचायत समितीमध्ये बहुमत असतानाही पळवापळवीच्या राजकारणात भाजपाला सत्तेबाहेर राहावे लागले. त्यामुळे यावेळी भाजपा सर्तक असून सदस्यांना एकत्र करीत देवदर्शनाला घेऊन गेल्याची माहीती मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षपद मिळवून येणाऱ्या विधानसभेमध्ये मतदारांमध्ये चांगला मॅसेज पोहोचविण्यासाठी भाजपातील काही सदस्य एकवटले आहे.
जिल्हा परिषद सदस्य ‘नॉट रिचेबल’
By admin | Updated: September 16, 2014 23:34 IST