मुहूर्तच सापडेना ! : उपसरपंचांचीही मागणी हवेत विरलीदेवाडा : लक्कडकोट राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे नाली बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदकाम केले. परंतु पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही नालीचे बांधकाम करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना ये- जा करताना त्रास सहन कराला लागत आहे.उपसरपंचांनी मागणी करुनही बांधकामाला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे लक्कडकोटवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र- तेलंगाणा राज्याच्या सीमेवर आणि जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर लक्कडकोट गाव वसले आहे. या गावात नाली बांधकामाला मंजुरी मिळाली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदकाम केले. परंतु पाच महिन्यांचा लोटूनही बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन उपसरपंच मनोज मून यांनी वारंवार तक्रार करुनही बांधकाम विभागाने कुठल्याही प्रकारे त्यांच्या तक्रारीबाबत दखल घेतली नाही. त्यामुळे बांधकाम नेमके कशासाठी थांबले आहे. याचे कारण कळू शकले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. येथून राज्य महामार्ग गेलेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जडवाहनांची मोठ्या संख्येत वर्दळ असते. या रस्त्याच्या कडेला अनेक खानावळी, किराणा दुकान, पानसेंटर, बसस्टॉप आहेत. त्यामुळे अनेक वाहन चालक येथे थांबून जेवण, चहा, नास्ता, किराणा सामान घेत असतात. मात्र रस्ता खोदण्यात आला असल्याने ये- जा करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. रखडलेले नालीचे बांधकाम त्वरित चालु करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच, उपसरपंच, तंंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या नालीचे बांधकाम रखडले असल्याने नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने या नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी उपसरपंच मनोज मून यांच्यासह अन्य नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
खोदकाम झाले; बांधकाम नाही
By admin | Updated: July 19, 2015 01:17 IST