कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १ एप्रिलपासून जिल्ह्यात ९१ केंद्र सुरू करण्यात आले. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका केंद्राचा अपवाद वगळल्यास सर्वच केंद्रांमधून कोविशिल्ड लस दिली जात आहे. वैद्यकीय महाविद्यालयातच कोव्हॅक्सिन डोस देणे सुरू आहे. गुरुवारी २३६ जणांनी ही लस घेतली. हेल्थ केअर, फ्रन्टलाइन वर्कर, ६० वर्षांवरील व सहव्याधीसह आता ४५ वर्षांवरील सर्वांनाच १ एप्रिलपासून लस घेण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे नागरिकांची गर्दी होऊ, यासाठी प्रशासनाने केंद्रांची संख्या वाढविली. राज्य शासनाकडे १ लाख १७ हजार डोसची मागणी करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी फक्त ३५ हजार डोस मिळाल्याने लसटंचाईचे सावट कायम राहणार आहे. गुडप्रायडेमुळे सर्व शासकीय केंद्रे बंद होती. मात्र, चंद्रपुरातील खासगी केंद्रात काहींनी आज लस घेतली. पण, संख्या मिळू शकली नाही.
आरोग्य प्रशासनाची कसोटी
चंद्रपूर मनपा अंतर्गत येणारे क्षेत्र मोठे असल्याने जादा डोसची गरज आहे. शिवाय, तालुकास्थळावरील केंद्रांमध्येही लस घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. त्यामुळे उपलब्ध लसींचे वितरण करताना आरोग्य प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
केंद्र सरकारचा हात आखडता
राज्यांना लस उपलब्ध करून देण्यासोबतच केंद्रांची संख्या, अंतर, वयोगट आदींपासूनचे सर्वच अधिकारी केंद्र सरकारने स्वत:कडे ठेवले. त्यामुळे राज्यांना पर्यायाने जिल्ह्यांनाही वेळोवेळी वाट पाहावी लागणार आहे.
वाढीव केंद्रांचा उपयोग काय?
नागरिकांना नजीकच्या केंद्रांवर लस घेण्यासाठी शहर व गावातील प्रत्येक वाॅर्डाला मतदान यादीप्रमाणे केंद्र ठरवून दिले. त्यानुसार लसीकरण केंद्र जोडण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. मात्र, अशा सूचनांना सध्या तरी केंद्र सरकारची मान्यता नाही. त्यामुळे मागणीनुसार लस मिळत नसेल तर वाढीव केंद्रांचा उपयोग काय, हाही एकच प्रश्न आहे.