परिवार जोडो अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सचिव सुदर्शन नैताम, ॲड. सारिका संदूरकर, ॲड. धीरज ठवसे, सचिन बरबतकर, नितीन चांदेकर, गंगाधर गुरनुले, विजय ठाकरे, स्वप्निल गावंडे, किशोर जांपालवर, रवि बोढे, पिंटू मून, राजू कांबळे, स्वप्निल सूत्रपवार, अमोल कांबळे आदी हा उपक्रम मागील काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात राबवित आहेत. संयुक्त कुटुंबाचा काळ अगदी आनंदात गेला. आता विभक्त कुटुंब पद्धती आली. यात कौटुंबिक वाद पराकोटीला जात आहे. अशा कुटुंबावर वडीलधाऱ्यांचा धाक राहिलेला नाही. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून विनाशाकडे जात आहेत, असे निरीक्षण डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी नोंदविले. कुटुंबात वाद होणे, पती व पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होण्यासाठी मोबाइल मुख्य भूमिका वठवित असल्याचेही त्यांनी सांगितले. मोबाइलच्या अतिवापरामुळे संशयवृत्ती वाढून कुटुंब तुटत आहेत. घटस्फोटाचे प्रमाणही वाढत आहे. पती-पत्नीच्या भांडणात मुलांचे भविष्य अंधकारमय होते. पुरुषांच्या माता-पित्यांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येत आहे. घरातील भांडणामुळे भाऊ-वहिनी, बहीण-भाऊजी, आई-वडील, नणंद-भावजय कुटुंबात मधुर संबंध कटु होत आहेत. कुटुंबात कलह निर्माण होण्याचे कारण आर्थिक, शारीरिक, लैंगिक व राजकीय असू शकते, या शुल्लक कारणावरून कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. नवऱ्याला, जावयाला सरळ करू या अविर्भावात राहून महिला कायद्याचा गैरवापर करून परिवाराला नरकयातना भोगावयास लावतात, असा आरोप डॉ. मैंदळकर यांनी केला.
बॉक्स
सासर व माहेरात हवा समन्वय
कौटुंबिक वादात सासर व माहेर दोन्ही अधोगतीला जात आहेत. समाज व कुटुंबाचे नुकसान होऊ नये, याकरिता पती-पत्नी, सासर-माहेर यांच्यात कसा समन्वय घडवून आणता येईल. दोन्ही पक्षाचे समुपदेशन करून परिवारात स्नेह व आनंद निर्माण व्हावा, याकरिता भारतीय परिवार बचाव संघटनेकडून परिवार जोडो संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. संघटनेचे सर्व सदस्य या सामाजिक कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आहे.