चंद्रपूर : चंद्रपुरातील अनेक भागांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. प्रत्येकवेळी पूरबुडित क्षेत्रातील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. नदीपात्रातच लोकांचा रहिवास असल्यामुळे त्यांना तिथून हटविण्यासाठी मनपाने अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावले. मात्र या नोटीसला न जुमानता नदीपात्रात त्यांचा रहिवास कायम आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेनेही नोटीस बजावण्यापलिकडे ठोस काहीच केले नसल्याने पूरपरिस्थिती उदभवल्यास नागरिकांचे नुकसान व महापालिकेची धावाधाव अटळ आहे.चंद्रपूर शहर आणि अतिक्रमण याचा अलिकडच्या काळात अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याचे दिसून येते. या कारणामुळेच शहराचे वाटोळे होत आहे, ही बाबही कुणी नाकारू शकणार नाही. चंद्रपूर शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीचे तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संघटना यापैकी कुणीही या नदीच्या दूरवस्थेला थांबवू शकले नाही. अनेक ठिकाणी या नदीचा नाला झाला आहे. मात्र इरई नदी वाहती होती. चंद्रपूरकरांना पिण्याची पाणीही या नदीतून मिळते. चंद्रपूरची तहान भागविणारी नदी असतानाही या नदीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करणे सुरू केले. वेकोलिचे महाकाय ढिगारे व नागरिकांच्या अतिक्रमणामुळे व कारखान्यांच्या रसायनमिश्रिम पाण्यामुळे ही नदी अरुंद व दूषित झाली. परिणामी पावसाळ्यात नदीचे पाणी थोपून चंद्रपूरकरांना दरवर्षी बॅक वॉटरचा फटका बसू लागला. या पूरपरिस्थितीमुळे अनेकवेळा अतोनात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, रहमतनगर, सिस्टर कॉलनी, नगिनाबाग परिसरात इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातच नागरिकांनी घरे बांधून रहिवास सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत. काहींनी तर चक्क नदीपात्रातच अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत. दुसरीकडे महाकाली वॉर्ड परिसरात झरपट नदीपात्रातही लोकांनी घरे बांधली आहे. या ठिकाणीदेखील त्यांचा रहिवास अनेक वर्षांपासून आहे. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आला की येथील लोकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. स्थलांतरित करूनही अनेकांचे मोठे नुकसान होते. इरई नदी पात्राची तर बाबच वेगळी आहे. इरई नदीला पूर आला की दोनतीन दिवस येथील पूरबुडित क्षेत्र पाण्याखाली असतो. येथील नागरिक इतरत्र आश्रयाला असतात. येथील नागरिकांनी या ठिकाणावरून स्थलांतरण करावे, यासाठी तेव्हा नगरपालिकेने जोरदार प्रयत्न केले नाही. त्यामुळे आणखी या भागात अतिक्रमण वाढत गेले. आतातर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. यावेळी महानगरपालिकेने झरपट व इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील रहिवाशांना नोटीस बजावून ही जागा सोडण्याचे निर्देश दिले. मात्र कित्येक वर्षांपासून येथील नागरिकांचा रहिवास असल्याने आता ते कुठे जाणार, हाही गंभीर प्रश्न आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. नव्हेतर सुरूच झाला आहे. मात्र नोटीस बजावल्यानंतर एकाही नागरिकांनी नोटीसला प्रतिसाद दिलेला नाही. महापालिकेकडे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असल्याने त्यांनीही बळजबरी केली नाही. मात्र या प्रकारामुळे यावर्षी पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे नुकसान अटळ आहे.नाल्यांमुळेही पूरपरिस्थितीचंद्रपूर शहरात नदी काठावर असलेल्या केवळ वेकोलिच्या महाकाय ओव्हरबर्डनमुळेच बॅक वॉटर येत नाही. याला चंद्रपुरातील मोठे नाल्यांचे थोपणेही कारणीभूत आहे. चंद्रपुरातील सुमारे ६० टक्के भागातून मोठे नाले वाहतात. या नाल्यावर नागरिकांनी वाट्टेल तसे अतिक्रमण करून ठेवले आहे. काही जणांनी तर या नाल्यावर पक्के बांधकाम करून हे नालेच गिळंकृत केले आहे. त्यामुळे हे नाले कधीच साफ करता येत नाही. त्या ठिकाणातील गाळ आणि कचरा वर्षानुवर्षापासून तसाच कायम आहे. परिणामी पावसाळ्यात पाणी वाहून जात नाही. त्यामुळे बॅक वॉटरमुळे अनेक भागात पाणी शिरते.ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थितीचंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र बदलत चालले आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागतो व पूरपरिस्थिती निर्माण होते. ४० टक्के चंद्रपूरकरांना याचा दरवर्षी फटका बसतो. वेकोलिला ओव्हरबर्डन हटविण्यासाठी ३१ मे २०१४ ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र अद्यापही हे महाकाय ढिगारे तसेच कायम आहे. असा आहे कायदाजल प्रदूषण कायदा १९७४ कलम ३३ प्रमाणे कोळसा खाणीचे प्रदूषित पाणी नदीत किंवा नाल्यात सोडता येत नाही. पूर रेषेच्या आत ढिगारे ठेवता येत नाही. त्यासाठी मजबुत संरक्षक भिंत बांधावी लागते. दूषित पाणी साठविण्यासाठी तळे आणि ओव्हरबर्डनवर वृक्षारोपण करावे लागते. परंतु वेकोलिने कधीच याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे चंद्रपूर सातत्याने प्रदूषित होत राहिले व पुराचा सामना करीत राहिले. इरईच्या खोलीकरणाला प्रारंभइरई नदीचे पात्र रुंद करा, खोलीकरण करा, ही मागणी सातत्याने रेटून धरल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. वेकोलि, वीज केंद्र व प्रशासनाच्या सहाय्याने मागील काही दिवसांपासून इरई नदीच्या पात्राचे खोलीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम विलंबाने सुरू झाल्यामुळे पात्र पूर्णपणे मोकळे होऊ शकले नाही. तरीही पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास यंदा अडथळे कमी येणार, असे बोलले जात आहे.
पूरबुडित क्षेत्रात नागरिकांचा ठिय्या
By admin | Updated: June 14, 2015 02:00 IST