जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : १६ ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात जल सप्ताह चंद्रपूर : राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासन करीत आहे. मात्र पाणी टंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य मिळाल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नसून यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून १६ ते २२ मार्चदरम्यान जल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अभियानात सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत शासकीय विभागप्रमुखांची बैठक शुक्रवार पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जी. मो. शेख, कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. सोनुने व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या सप्ताहात शाळा, महाविद्यालय, गाव, ग्रामपंचायतस्तरावर जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माध्यमातून पाणी व पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १६ ते २२ मार्च या सप्ताहात जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करुन पाणी वाचवाचा संदेश देण्यात येणार आहे. जल सप्ताह केवळ शासनाचा उपक्रम नसून तो जनतेचा उपक्रम आहे. या उपक्रमात जिल्हावासीयांनी सक्रिय सहभाग घेऊन पाणी बचतीचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पाण्याविषयी कथाकथन, कविता वाचन, लघुनाटय, जलसाहित्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये जलजागृती करण्यात येणार आहे. पाणी, पाण्याची गुणवत्ता, स्थानिक सिंचन प्रकल्प, सिंचन व्यवस्थापन यंत्रणा व त्यांची कार्यपध्दती याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय यामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावोगावी पाण्याचे महत्त्व पटवून देणारे मेळावे, कीर्तन व पथनाट्य आयोजित करुन जल जागृती करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.जल सप्ताहाचा एक भाग म्हणून वॉटर रन किंवा जल दौड आयोजित केली जाणार आहे. ही अभिनव कल्पना असून आपल्या कॉलनीत, शाळेत, महाविद्यालयात जल दौडचे आयोजन करुन पाणी वाचविण्याचा संदेश, पाण्याचा जपून वापर करणे व पाण्याचे महत्त्व समजावून सांगता येईल.शासनाच्या या जल सप्ताहात सर्वांनी सहभागी झाल्यास पाणी बचतीचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी बचतीचे विविध कार्यक्रम आयोजित करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जल सप्ताहात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:41 IST