२३२ जवान दाखल : अतिसंवेदनशील क्षेत्रात असल्याने सुरक्षा व्यवस्था बदललीदुर्गापूर : अतिसंवेदनशील अशा चंद्रपूर वीज केंद्रात बहुप्रतिक्षित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. मंगळवारी येथील मुख्य अभियंता राजू बुरडे यांच्या हस्ते सेरिमोनियल फ्लॅग होस्टिंग करून सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे सोपविण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुंबई येथील सीआएसएफचे समूह मुख्यालयाचे ग्रुम कमान्डेन्ट पी.एन. ठाकूर, मुख्य अभियंता (प्रकल्प) प्रदीप शिंगाडे, उपमुख्य अभियंता (प्रशासन) सुनील आसमवार, वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा), सुधाकर इंगळे, उपवरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा) नवीनकुमार सत्तीवाले व स्थानिक विद्युत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र देशातील सर्वात मोठे वीज केंद्र आहे. हे अतिसंवेदनशिल वर्गवारीत येत असून १२ हजार २६१ परीक्षेत्रात या केंद्राचा व्याप आहे. अशा वीज केंद्राची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून वेळोवेळी केंद्रीय गुप्तचर संस्थेद्वारे सुरक्षेचा आढावा घेण्यात येत होता. आयबीने सुचविलेल्या निर्णयानुसार महानिर्मितीच्या मुख्यालय पातळीवर येथील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने वीज केंद्राची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपविण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्याकरिता मागील तीन वर्षांपासून वीज केंद्र व्यवस्थापकाडून सतत पाठपुरावा सुरू होता. फलस्वरुप २९ आॅगस्टला सीआयसीएफचे २३२ जवान येथे दाखल झाले. (वार्ताहर) महानिर्मिती कंपनीच्या इतिहासात प्रथमच चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा सीआयएसएफकडे हस्तांतरीत केले आहे. वीज केंद्राची वीज निर्मिती कशी अविरत सुरू राहिल, याबाबत आवश्यक सुरक्षा व दक्षता घेण्याचे आवाहन करीत त्याकरिता सीआयएसएफला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्य अभियंता राजु बुरडे यांनी कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर केंद्राच्या सुरक्षेची प्रतिरुपी चावी ग्रृप कमान्डेन्ट पी.एन. ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली व दुपारी ११ वाजता सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे सोपविण्यात आली.
वीजनिर्मिती केंद्राची सुरक्षा सीआयएसएफकडे
By admin | Updated: August 31, 2016 00:39 IST