चंद्रपूर : कोळसा खाणी आणि उद्योगांची भरमार असलेल्या तसेच महाऔष्णिक वीज केंद्रामुळे देशाच्या पटलावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४४ अंशापार गेला आहे. शनिवारी येथे ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षीचे आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. उन्हाळ्यात चंद्रपूरच्या तापमानात दरवर्षीच वाढ होते. यावर्षी एप्रिल महिना सुरू होताच, पहिल्या आठवड्यानंतर सूर्य आग ओकू लागला आहे. शनिवारी तर सूर्याने कहरच केला. यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. एप्रिल महिन्यात लग्नाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने तीव्र उन्हाची झळ लग्न समारंभालाही बसत आहे. एकीकडे यंदा जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी रानावनात भटकावे लागत आहे. त्यात उन्हाचा पार वाढल्याने भर उन्हात नागरिकांना पाण्याचा शोध घेत भटकावे लागत आहे. उन्ह वाढल्याने विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. उष्णता इतकी आहे की कुलरची हवादेखील या उकाड्यात दिलासा देण्यास असमर्थ ठरत आहे. (प्रतिनिधी)
चंद्रपूरचा पारा ४४.८ अंशावर
By admin | Updated: April 17, 2016 00:38 IST