बदलीपात्र शिक्षकांत रोष : पंचायत समित्यांनी केलेली निवड अयोग्यचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. शिक्षकांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या करताना २७ फेब्रुवारी २०१७ च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयात अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्राची निवड करण्याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. मात्र प्राथमिक शिक्षण विभागाने ६ मार्च रोजी एक परिपत्रक काढून पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना अवघड व सर्वसाधारण क्षेत्राची निवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात केंद्रप्रमुखांच्या मर्जीतील शाळांना अवघड व सर्वसाधारण क्षेत्रात समाविष्ट केले जात असल्याने या प्रकाराने अनेक शिक्षकांत तीव्र संताप पसरला आहे. कोणत्या शाळा अवघड क्षेत्रात आणि कोणत्या शाळा सर्वसाधारण क्षेत्रात आहेत, याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना विचारणा करायला पाहिजे होती. परंतु त्यांनाही विश्वासात न घेता परस्पर केंद्रप्रमुखांनी सुचविलेल्या शाळांचीच अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून निवड केलेली आहे, असा आरोप शिक्षक संघटनांकडून होत आहे. अवघड क्षेत्रातील शाळेची निवड करताना किमान शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. अवघड क्षेत्रातील शाळांची करण्यात आलेली निवड ही चुकीची असून जिल्ह्यातील बफर झोनमधील शाळांना अवघड क्षेत्रात दाखविण्यात येऊन शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सीईओ व उपशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन अवघड क्षेत्रातील शाळा निवडीच्या प्रकारावर रोष व्यक्त करीत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष जे. डी. पोटे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदरसिंह व प्राथ. विभागाचे उपशिक्षणाधिकारी रामराव चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात बफर झोनमधील शाळांना अवघड क्षेत्रात दाखविण्यात यावे, बदली प्रक्रियेपूर्वी विषय शिक्षकांची पदस्थापना करणे, वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, वरोरा पं.स. मधील आदिवासी प्रोत्साहन भत्त्यांची थकबाकी काढणे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी संघटनेचे सचिव किशोर उरकुंडवार, वरोराचे तालुकाध्यक्ष विद्याचरण गोलर, चंदन बिलपणे, गडचांदूर सोसायटीचे अध्यक्ष शंकर गोरे, उपाध्यक्ष नारायण तल्कापल्लीवार, अनिल झाडे, संतोष जुनघरे यांची उपस्थिती होती.
अवघड क्षेत्रातील शाळांच्या निवडीत केंद्रप्रमुखांची मनमर्जी
By admin | Updated: March 20, 2017 00:28 IST