ब्रह्मपुरी : इंदिरासागर गोसेखूर्द धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असले, तरी दुसरीकडे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मरण ठरले आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जमीन अधिग्रहीत करताना प्रकल्पग्रस्तांना आश्वासने देण्ययात आली. मात्र, आश्वासने फोल ठरली आहेत.गोसेखूर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात भूज येथील २५ ते ३० अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, या शेतकऱ्यांना जमिनीचा समाधानकारक मोबदला मिळालेला नाही. एकरी अडीच लाख रुपये आणि दुसरीकडे शेतजमीन देऊ असे आश्वासन देण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी जमिनी विकल्या. परंतु आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. दिलेल्या आश्वासनांप्रमाणे दुसरी जमीन देण्यात यावी, अथवा एकरी पाच लाख रुपये दर ठरवून उर्वरित रक्कम देण्यात यावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.गोसेखुर्द प्रकल्पाचे दोन मुख्य कालवे असून उजव्या कालव्यामध्ये भूज येथील २५ ते ३० शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. या कालव्याचे तीनवळा सर्वेक्षण करण्यात आले. अगोदरच्या सर्वेक्षणात कोणत्याही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या नव्हत्या. माात्र शेवटी सर्वेक्षण बदलून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीमधून कालवा काढण्यात आला. याच बरोबर मिळणारा मोबदलाही अत्यल्प देण्यात आला.उजव्या कालव्याला जोडूनच चार नंबरचा उपकालवा काढण्यात आला. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्यांना मात्र एकरी ४.९४ लाख रुपये मोबदला देण्यात आला. त्यामुळे भूज येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी असंतोष व्यक्त करीत आहेत. जमीनच कालव्यात गेल्याने मजुरीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. जोपर्यंत वाढीव रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत फेरफारच्या कागदावर स्वाक्षरी करणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
कालव्यााने उदरनिर्वाहाचे साधन हिरावले
By admin | Updated: August 1, 2014 00:13 IST