हरीश गेडाम : ग्रामस्वराज्य अभियानाला प्रारंभबल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय दिला. उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी संघर्ष केला. त्यांच्या लढ्यामुळे समाजाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या अतुलनिय कार्याने देश एकसंघ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीने समाज परिवर्तन होत आहे, असे मत बल्लारपूर पंचायतीचे माजी सभापती अॅड. हरीश गेडाम यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.बल्लारपूर पंचायत समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सभागृहात ग्राम उदय ते भारत उदय अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. सदर अभियान १४ ते २४ एप्रिल दरम्यान तालुक्यातील १७ ग्रामपंचायत स्तरावर राबविले जाणार आहे. अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. गेडाम बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे, गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू, पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मी कुमरे, सुशील गुंडावार, सुधाकर खांडरे, सुनील नुतलवार, सरिता उरकुडे, प्रदीप ताडुरवार, अभियंता श्रीवास्तव यांची उपस्थिती होती. दरम्यान, उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना राष्ट्रीय समरसता दिनाप्रीत्यर्थ शपथ दिली.बीडीओ गजभे यांनी पंचायत राज संस्थेच्या बळकटीकरण करण्यासंदर्भात सदर अभियानात गावागावात सामाजिक सलोखा, शेतकऱ्यांचा विकास, गरिबांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना आणि ग्राम किसान सभा आयोजित करण्याचे निर्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. संचालन तावाडे यांनी तर आभार लक्ष्मी कुमरे यांनी मानले. यावेळी पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती केली
By admin | Updated: April 16, 2016 00:43 IST