चंद्रपूर : आतापर्यंत वादात अडकलेले घराघरातून कचरा संकलित करण्याचे कंत्राट अखेर महानगरपालिकेने तीन दिवसांपूर्वी सुरू केले. मात्र या कंत्राटाबाबत केलेला करारनामा दाखविण्यास वा देण्यात महानगरपालिका टाळाटाळ करीत आहे. वास्तविक करारनामा न करताच या कंत्राटी कामाचे उदघाटन केल्याचा आरोप महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक नंदू नागरकर यांनी केला आहे.घराघरातून कचरा संकलन करण्याच्या कंत्राटात चांगलाच घोळ झाला असल्याचा आरोप प्रारंभापासून आपण करीत असल्याचे नागरकर यांनी सांगितले. असे असतानाही याबाबत गांभीर्याने चौकशी करण्यात आली नाही. वास्तविक हा विषय स्थायी समितीत चर्चिला जाऊन तांत्रिक बाजु तपासणे, इतर महानगरपालिकेची माहिती मागविणे आवश्यक होते. मात्र स्थायी समितीच्या तत्कालीन सभापतींनी जबाबदारी झटकत हा विषय आमसभेत ढकलून बहुमताने पारित केला. या कंत्राटात दर अधिक लावण्यात आल्याचे पटवून दिल्यानंतर आयुक्तांनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशनला पत्र देऊन दर कमी करण्याचे सूचविले. मात्र या कंपनीने त्यास नकार दिला. आयुक्तांनी याबाबत आणखी एक पत्र कंत्राटदारांना दिले. दरम्यान, आ. नाना श्यामकुळे यांनी यात हस्तक्षेप करीत मनपातील मुद्यावर विश्रामगृहात बैठक घेतली. आयुक्तांवर जबाव टाकून तीन लाख कमी करून हे कंत्राट निश्चित केले, असा आरोपही नागरकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदारांसोबत कोणताही करार न करताच या कंत्राटाचे उदघाटन करून कामही सुरू करण्यात आले आहे. आपण २३ जून, १४ जुलै आणि १५ जुलैला वारंवार सदर करारनामा देण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली.मात्र मनपा प्रशासन करारनामा दाखविण्यास टाळाटाळ करीत आहे,असेही नागरकर यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)
करारनामा देण्यास महानगरपालिकेची टाळाटाळ
By admin | Updated: July 19, 2015 01:18 IST