वरोरा : गंमत म्हणून नदी पात्रात उतरणाऱ्या दहावीतील एका शाळकरी मुलाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्य झाल्याची घटना घडली होती. प्रशासनाने युध्दपातळीवर नदीच्या पाण्यात शोध मोहीम सुरू ठेवली. अखेर तीस तासानंतर त्या मुलाचे प्रेत हाती आले.वरोरा शहरा लगतच्या सेंट अॅन्ट पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारे सहा मुले व पाच मुली रविवार असल्याने सकाळीच वरोरा शहरानजीकच्या मार्डा गावातील वर्धा नदीच्या पात्रात गेले होते. ११ मुल-मुलींमध्ये काहींनी शिकवणी वर्गाला दांडी मारली होती. नदीच्या पात्रात उतरलेला श्रेयस प्रकाश खारोडे याने पाण्यात पोहण्याकरिता उडी घेतली. तो काही कळण्याच्या आतच खोल पाण्यात जाऊन गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याच्यासोबत असलेल्या दोन मुलांनी श्रेयसला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले व श्रेयस बुडाला. ही माहिती वरोरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविली. परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील बोट व तज्ज्ञांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्यासोबत माजरी येथील विक्रम जव्हेरीया व वरोरा येथील विठ्ठल कार्लेकर यांनी रविवारपासून शोध मोहीम राबविली. त्या दिवशी मृतदेहाचा थांगपत्ता लागला नाही व अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविली. सोमवारी सकाळी ६ वाजेपासून शोध मोहीम राबविणे सुरू केले. दुपारच्या सुमारास श्रेयसचा मृतदेह हाती लागला. मृतदेहाची उत्तरणीय तपासणी व शवविच्छेदन करून मृतदेह आप्तेष्टांच्या ताब्यात दिल्यानंतर वरोरा येथील बोर्डा पुलानजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेयस विनायक नगरात राहत होता. त्याचे मातापिता वैद्यकीय अधिकारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)
३० तासांनंतर गवसले शाळकरी मुलाचे प्रेत
By admin | Updated: September 8, 2015 00:44 IST