कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून एसटी बंद करण्यात आली. त्यानंतर ५० टक्के तत्त्वावर बससेवा सुरू करण्यात आली. आता बंद असलेल्या बहुतांश बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या, प्रवाशांची संख्याही वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, राजुरा हे चार आगार असून, या आगारातून सुमारे २२५ बसच्या १४०५ बसफेऱ्या ८० हजार कि.मी. धावतात. ५८३ बसचालक, तर ३६७ वाहक कर्तव्य बजावतात. या वाहक, चालकांचा दररोज सुमारे २० हजारांच्या जवळपास नागरिकांशी संपर्क येतो. मात्र, याची कुठलीही तपासणी होत नसल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुविधा पुरविणे गरजेचे आहे.
२० हजार प्रवशांचा रोज प्रवास
चंद्रपूर जिल्ह्यात चार आगारांतून २२५ बसेस धावतात. दररोज साधरणत: ८० हजार कि.मी.चा प्रवास करतात. यामध्ये साधरण २० हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासी काळजी घेत आहेत. चालक-वाहकसुद्धा आपली काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
तपासणीच नाही
दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या चालक व वाहकांची राज्य परिवहन महामंडळाकडून कोणतीही तपासणी केली जात नाही. लगतच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेथील प्रवासी आपल्या जिल्ह्यात येत आहेत. त्यांचा वाहक, चालकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत राज्य परिवहन महामंडळ गंभीर नसल्याचे दिसून येते.
बॉक्स
दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या आणि फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या एस. टी. चालक वाहकांना लस देण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांची लस देण्याची मागणी आहे. परंतु, अधिकृतरीत्या मागणीचे निवेदन देण्यात आले नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांचा अजूनही विचार झालेला नाही. त्यामुळे त्यांना लसीचे संरक्षण अध्याप मिळाले नाही.
बॉक्स
मास्क, सॅनिटायझर नसल्याने गैरसोय
चालकांना मास्क, सॅनिटायझर पुरविल्या जात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे चालक व वाहकांना स्वत:लाच व्यवस्था करावी लागत आहे. त्यातील काहीजण मास्क वापरताना काहीजण रूमाल वापरताना, तर काहीजण कसलाच वापर करीत नसून त्याच स्थितीत तिकीट फाडताना आढळून येतात.
कोट
दररोज आमचा हजारो नागरिकांशी संपर्क येतो. मात्र, अद्यापही आम्हाला लसीकरण दिले नाही, तसेच मास्क व सॅनिटायझर पुरविले नाही. परजिल्ह्यात बसफेऱ्या धावत असल्याने वाहक, चालकांना लसीकरण गरजेचे आहे.
-दत्ता बावणे,
विभागीय सचिव, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना
----
सुरुवातीला एकादा मास्क दिले तेव्हापासून आतापर्यंत मास्क पुरविले नाही. निर्जंतुकीकरण करण्यात आले. परंतु, दररोज शेकडो लोकांशी संपर्क येत असूनही लसीकरणाबाबत कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही.
संजय सोमनकर
विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना