पावसाची हुलकावणी कारणीभूत : आतापर्यंत ६८ टक्के पेरण्या चंद्रपूर : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही शंभर टक्के पेरण्या आटोपल्या नसून पावसाच्या हुलकावणीने ३२ टक्के पेरणीचे कामे खोळंबल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मृग नक्षत्रात समाधानकरक पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी लगबग सुरू करून कामांना सुरूवात केली. त्यावेळी चार ते पाच दिवस झालेल्या पावसाने यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, अशी अशा शेतकरी व्यक्त करू लागले. मात्र पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर तब्बल १५ ते २० दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांची पिके उगवून जमिनीतच करपू लागली. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात अनेकांची पिके तीव्र उन्हामुळे करपून गेली. पावसाने १५ ते २० दिवस हुलकावणी दिल्याने हतबल झालेला शेतकरी संकटात सापडला होता. त्यानंतर २१ जुलैला पावसाचे आगमन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सध्या रिमझीम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे पिके करपून गेली त्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. जिल्ह्यात भाताचे १ लाख ६६ हजार ३१२ हेक्टर क्षेत्र असून यापैकी २२ हजार ५५३ क्षेत्रावर रोवणी झाली आहे. तर, कापूस, सोयाबीन या पिकांचीही पेरणी मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझीम पावसाने ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अपूर्ण आहेत त्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)१४ टक्के हेक्टर क्षेत्रावर रोवणी अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली असली तरी ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी लवकर पऱ्हे टाकल्याने १४ टक्के क्षेत्रावर रोवणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. तर आवत्या १०६ टक्के क्षेत्रावर झाले आहे.मुसळधार पावसाचीशेतकऱ्यांना प्रतीक्षाचजिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रोवणीच्या कामांना वेग येईल. तर इतर पिकांनाही पावसाचा फायदा होणार आहे. ५१ टक्के सोयाबीन पेरण्याजिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सर्व साधारण क्षेत्र ८६ हजार ४६० असून यापैकी ५१ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. तर कापूस पिकाचे यावर्षी दुप्पटीने क्षेत्र वाढल्याने २४९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
३२ टक्के पेरण्या अपूर्णच
By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST