चंद्रपूर : अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना मूल दत्तक घेता यावे, यासाठी शासनाने बालक दत्तक योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शहरातील किलबिल संस्थेच्या माध्यमातून मागील पाच वर्षात १४ मुलांना परदेशात तर ३७ मुलांना देशांतर्गत दत्तक घेण्यात आले आहे. त्यामुळे या मुलांना आई-वडिलाचे प्रेम मिळाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ६ बालगृहे आहेत. येथील अनाथ, कुमारी माता यांनी सोडून दिलेली मुले दत्तक किलबिल संस्थेकडे बालकल्याण समितीच्या समक्ष दिली जातात. तेथे त्यांचा सांभाळ करण्यात येतो. येथील मुले गरजू व इच्छुक दाम्पत्यांना दत्तक देण्यात येतात. दत्तक प्रक्रिया ही केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरणामार्फत ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली जाते. यामध्ये परदेशातील दाम्पत्यांनासुद्धा मुले दत्तक घेता येतात. सन २०१६ पासून २३ फेब्रुवारीपर्यंत चार मुले व १० मुली परदेशातील दाम्पत्यांनी तर १८ मुले व १९ मुली देशातंर्गत दाम्पत्यांनी दत्तक घेतली असून त्यांचा पोटच्या मुलासारखा सांभाळ करीत आहेत.
बॉक्स
मुली दत्तक घेणाऱ्यांची संख्या वाढली
मागील पाच वर्षांपासूनची दत्तक घेणाऱ्यांची आकडेवारी बघितल्यास मुलींना दत्तक घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सन २०१५ पासून २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत २९ मुली तर २२ मुले दत्तक घेतली आहेत. यातील दहा मुली व चार मुले देशाबाहेर दत्तक घेण्यात आली आहेत.
बॉक्स
दत्तक घेण्यासाठी अनेकजण वेटिंगवर
मुले-मुली दत्तक घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्या जातात. त्यांना अपेक्षित असलेले मुले, मुली दत्तक देण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत असतो. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या नावाचा दत्तक यादीत समावेश होता. जिल्ह्यात अद्यापही अनेक दाम्पत्य मुले दत्तक घेण्यासाठी वेटिंगवर आहेत.
-----
कोट
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मुले दत्तक देण्यात येतात. आपल्याकडील १४ मुले देशाबाहेर तर ३७ मुले देशातंर्गत दत्तक देण्यात आली आहेत. मुले दत्तक घेतलेल्या दाम्पत्यांशी विविध कारणांमुळे संपर्क होत असतो. त्यावेळी मुलांची खुशहाली कळत असते. त्यामुळे मोठा आनंद मिळतो.
-अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर