खोटे बोलून निव्वळ दिशाभूल : वारजुकर-अहिरकरांचे जिल्हा परिषद अध्यक्षांवर शरसंधानचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले आमच्या आरोपांना थेट उत्तर देण्याऐवजी दिशाभूल करणारी उत्तरे देवून पळवाटा शोधत आहेत. त्यांनी १३ व्या वित्त आयोगाच्या फाईली कशासाठी अडविल्या, असा आमचा साधा प्रश्न आहे. मात्र त्याचे उत्तर न देता त्या खोटी उत्तरे देवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्या फाईल त्यांनी केवळ कमिशनसाठीच अडविल्या असल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुकर आणि उपाध्यक्ष विनोद अहीरकर यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेतून केला.जिल्हा परिषदेतील अर्थिक गैरव्यवहाराचे आणि अडवणुकीचे प्रकरण सांगताना वारजुकर म्हणाले, १३ व्या वित्त आयोगाच्या फाईल रखडण्याचे कोणतेही कारण नव्हते. केवळ अध्यक्षांमुळेच त्या रखडल्या आहेत. ५७ ग्रामपंचायतींना ४५ लाख तीन हजार रूपयांचे पॉवरप्लँट पुरविण्याचे ठरल्यावर ३० मार्चला पुरवठादाराला आदेशही देण्यात आले होते. त्यासाठी ग्रामपंचायतींचीही यादी अध्यक्षांनी द्यायची होती. पुरवठ्याची मुदत ४५ दिवसांची असतानाही अध्यक्षांनी जाणिवपूर्वक यादीच दिली नाही. परिणामत: १३ मे रोजी पुरवठ्याची मुदत संपली. २८ आॅगस्टला अध्यक्षांनी आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यात त्यांच्याच पक्षांच्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कल्पना बोरकर, अर्थ-आरोग्य सभापती ईश्वर मेश्राम उपस्थित नव्हते. केवळ कमिशनबाजीसाठी अध्यक्ष अर्थ आणि कृषी विभागात ढवळाढवळ करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांनाही केवळ कमिशनसाठी मुदतवाढ दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आपण आक्षेप नोंदविल्यावर ३५ कामांच्या निविदा काढण्यात आल्या. त्यात २७ ते ३७ टक्के कमी दराने निविदा आल्याने शासनाचाच निधी वाचला. आपल्या काळात अशी मुदतवाढ देण्यात आली होती, असा आरोप गुरूनुले यांनी केला आहे. प्रत्यक्ष त्यांनी कागदपत्रांचा अभ्यास करून बोलावे, अशीही कोपरखळीे वारजुकर यांनी यावेळी मारली.२०१४-१५ या वर्षातील बांधकामासाठी आलेला ४५ कोटी २८ लाख रूपयांचा निधी अद्यापही अखर्चित आहे. या कामाचे नियोजन झाले असून कार्यारंभाचे आदेश देण्यात आल्याची अध्यक्ष निव्वळ थाप मारत आहेत. प्रत्यक्षात या मुद्यावर जनतेची दिशाभूल सुरू आहे. मारोडा येथील निकृष्ठ बंधाऱ्याच्या कामाच्या चौकशीची मागणी करूनही चौकशीचे आदेश का दिले नाही, हे संध्या गुरूनुले यांनी स्पष्ट करावे. आपल्याकडे तीन महिने नस्ती का अडवून ठेवल्या, ते सुद्धा सष्ट करावे, असे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवाराच्या कामात प्रगती असल्याचे अध्यक्ष सांगत असले तरी १४४ पैकी फक्त ५४ कामेच सुरू आहेत. यातही जनतेची दिशाभूलच आहे. आपल्याकडे सर्व पुरावे असून जनतेच्या दरबारात ही सत्यता मांडू, ‘अध्यक्ष हटावो’साठी जिल्हा परिषदेत काँग्रेसच्यावतीने मोहीम राबविली जाईल, असाही इशारा यावेळी देण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)तुम्ही सत्तेबाहेर का याचे भान ठेवा - संध्या गुरूनेलेंचा टोलाचंद्रपूर : जिल्हा परिषदेत मागील काळात काँग्रेस सत्तेत असताना आता मात्र सत्तेबाहेर आहे. आपण सत्तेबाहेर का गेलो, याचे भान ठेवा आणि आत्मचिंतन करा, असा सल्ला देत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी सतीश वारजुकर आणि विनोद अहीरकर यांना टोला लगावला आहे.वारजुकरांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यातील आरोपांना उत्तर देणारे एक पत्रक सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयातून प्रसारित करण्यात आले. यात, वारजुकर आणि अहीरकर यांच्या खोट्यानाट्या आरोपांमुळे जनतेची फुकटात करमणूक होत असल्याचे सांगत आरोपांची खिल्ली उडविली आहे. सत्ताकाळात जनतेची कामे न करता केवळ स्वार्थ साधल्यानेच त्यांना जनतेने सत्तेबाहेर फेकले. आता जनतेच्या हिताचा खोटा पुळका दाखूवन आपल्यावर खोटे आरोप करणे त्यांनी बंद करावे, असा सल्लाही संध्या गुरूनुले यांनी या पत्रकातून दिला आहे. नव्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारजुकर-अहीरकर यांनी जुनेच आरोप केल्याने त्याला उत्तर देण्याची गरज नसल्याचे सांगून, आपल्या पक्षाला मतदारांनी जनतेची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेत निवडून आणले आहे. त्यामुळे खोट्या आरोपांना उत्तरे देण्यापेक्षा जनतेच्या विकासकामात वेळ खर्ची घालणे आपणास आवडते, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या आरोपांवर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्य काय ते बाहेर येईलच, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
१३ व्या वित्त विभागाच्या फाईली केवळ कमिशनसाठीच अडकल्या
By admin | Updated: September 8, 2015 00:50 IST