पुरातत्त्व विभागाने मालक बनून नाही तर केअर टेकर म्हणून जबाबदारी घेण्याची आवशकता :
खासदार सुप्रिया सुळे करणार पाहणी
सिंदखेड राजा : मातृतीर्थ सिंदखेड राजा शहर परिसरात सहाशे वर्षांपूर्वी हाडाचं पाणी करून ज्या ऐतिहासिक वास्तू उभ्या राहिल्या त्या आज इतिहास आहेत. मात्र, वर्तमानात वावरणाऱ्या व्यवस्थांनी या पुरातन वास्तूंकडे अनाकलनीय दुर्लक्ष केल्याने या वास्तू येत्या काही वर्षांत नामशेष होतील? अशी भीती व्यक्त होत आहे.
सिंदखेड राजातील ऐतिहासिक वास्तू आजही इतिहास काळातील महापुरुषांच्या पराक्रमाची, त्यांच्या कार्यशैलीची साक्ष देत दिमाखात उभ्या आहेत. गरज आहे ती त्यांच्या देखभाल दुरुस्तीची. सिंदखेड राजा येथेही पंधराव्या शतकात बांधलेल्या अनेक वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या वास्तूंची कुठे पडझड झाली आहे, तर कुठे मोठमोठी झाडे उगवली आहेत. सिंदखेड राजा म्हणजे स्वराज्याची प्रेरणा असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंची जन्मभूमी. स्वराज्य घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ इतकाच येथील परिचय नसून ज्या स्वराज्यात तुम्ही- आम्ही दिमाखाने जगतो आहोत त्या स्वराज्याची प्रेरणा छत्रपतींना जिजाऊ मासाहेब यांच्याकडून मिळाली. त्यामुळे या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
केंद्र व राज्य पुरातत्त्व विभागात समन्वयाची गरज
येथे एकूण १४ वास्तू आहेत. यातील काही राज्य पुरातत्त्व विभाग व काही केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहेत. मागील काही काळात येथील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन, संवर्धन व दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा निधी आला. कंत्राटदाराने सुरू केलेली कामे अर्धवट अवस्थेत पडून राहिली. शेकडो वर्ष जुन्या वास्तू असल्याने त्यांचे जतन, संवर्धन होणे अपेक्षित असताना या वास्तू केवळ खंदहर बनून राहिल्या आहेत. राज्य व केंद्र सरकारने या वास्तूंना विशेष दर्जा देऊन तत्काळ मोठा निधी देणे अपेक्षित आहे.
--मंदिर झाले स्मारक--
येथील श्री रामेश्वर मंदिराची आज अत्यंत दुरवस्था आहे. हे मंदिर असले तरीही याला केंद्रीय पुरातत्त्व विभागाने स्मारक घोषित करून येथील धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे या पुरातन संस्थांचा विकास खुंटला आहे. मंदिरावर लादलेले निर्बंध तत्काळ उठविले जावे, अशी मागणी होत आहे.
--राजवाड्याची दुरवस्था--
ज्या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला तो लखोजीराव जाधव यांचा राजवाडा राज्य पुरातत्त्व विभागाकडून दुर्लक्षित आहे. येथे जिजाऊ जयंतीला राज्यभरातून लाखो जिजाऊ भक्त येतात. मात्र, त्यांना कोणत्याच सुविधा येथे मिळत नाहीत. इतिहासाचा अभ्यास म्हणून येथे विद्यार्थी सहलीला येतात. त्यांना इतिहासाची माहिती यथायोग्य पद्धतीने दिली जात नाही. ती जबाबदारी पुरातत्त्व विभागाने घेऊन येथील प्रलंबित विकासकामे तत्काळ मार्गी लागण्याची गरज आहे. अत्यंत सुबक दगडी मूर्ती असलेला पुतळा बारव आज अखेरची घटका मोजत आहे. ज्या भागात ही वास्तू आहे तेथील वाद पुरातत्त्व विभागाला सोडविता आलेला नाही. त्यामुळे ही अत्यंत कलाकुसर असलेली वास्तू, त्यातील सुबक मूर्ती तशाच पडून आहेत.
मोठा तलाव किंवा मोती तलाव
लखोजीराव जाधव यांच्या काळात सिंदखेड राजा हे शहर आजपेक्षाही मोठे होते. कालांतराने या शहराचा व्याप कमी होत गेला; परंतु त्या काळात बांधलेले तलाव ज्यात मोती तलाव, चांदणी तलाव, सजणा बारव, बाळ समुद्र, गंगा सागर या भव्य विहिरी म्हणजे पाणी व्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहेत. त्या काळात मोती तलावातील पाणी सिंचन व अन्य व्यवस्थासाठी वापरले जात होते. आज मोती तलावाच्या पाळुवर मोठंमोठी झाडे उगवली आहेत. त्यामुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहेत. शहरातील अन्य महत्त्वाच्या वास्तू देखील पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या धोका आहे.
खासदार सुप्रिया सुळे दखल घेणार?
या सर्व ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे २५ सप्टेंबर रोजी शहरात येत आहेत. या वास्तूंची पाहणी करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्या आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीतून किंवा त्यांच्या पाहणी कार्यक्रमातून या संपूर्ण वास्तूंची दखल पुरातत्त्व विभाग घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.