देऊळगाव राजा : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार, तर २६ प्रवासी जखमी झाले. यापैकी नऊ जण गंभीर असल्याने त्यांना जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही घटना २३ ऑगस्ट राेजी दुपारी घडली.
परिवहन मंडळाची बस औरंगाबादवरून यवतमाळकडे साेमवारी दुपारी देऊळगाव राजामार्गे जात होती. जालना बायपासवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकने (क्र. एमएच १८ बीएच १९१९) बसला धडक दिली. यामध्ये बसमधील महिला गयाबाई खंडारे (वय ६५) या जागेवरच ठार झाल्या. तसेच २६ जण जखमी झाले. त्यापैकी नऊ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमीमध्ये कोमल सोनवणे (३०, शिराळा), दिगंबर दत्ता वाळे, गारखेडा, सुशीला पवार, विकास आरसा रिसोड, श्याम सुरेश गोफणे (औरंगाबाद), रजीहा मुन्नीवाले (कारंजा लाड) व मारुती धनाजी हरकळ (जालना), मुसा बाबू मुन्नीवाले (कारंजा लाड), संगीता मारोती हरकळ, (आंबा, ता. परतूर) या गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. बसचालक मोहसीन करीम शेख यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहेत.
एसटी महामंडळाकडून दहा हजार रुपयांची मदत
अपघातानंतर चिखली येथील विभाग नियंत्रक पवार यांनी भेट दिली तसेच विभागीय वाहतूक अधीक्षक अमृत कच्छवे, चिखली आगार व्यवस्थापक व्ही. श्री. वाकोडे, वाहतूक नियंत्रक एस.टी. ढोणे, एस. पी. परदेशी, शिवानंद जायभाय, चिखली आगारचालक आदींनी जखमींची भेट घेऊन त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली.
बसचा झाला चुराडा
औरंगाबाद - यवतमाळ या बसमध्ये एकूण ३७ प्रवासी प्रवास करीत हाेते. जालना बायपासवर येताच भरधाव ट्रकने बसला जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण हाेती की बसच्या मागील भागाचा चुराडा झाला.