महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांची संख्या २८ हजार १४४ एवढी असून, राज्य सरकारने महात्मा गाधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्यामध्ये सन २००६ पासून आजतागायत राज्यात एकूण २८ हजार १४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून ६ टक्के मानधनावर कार्यरत असून, सन २००६ पासून गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतात. पण प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनलच्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते. पण राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यावर सुडबुध्दीने ग्रामरोजगार सेवकावर खोट्या प्रोसेडिंगद्वारे कामावरून कमी करून जाणिवपूर्वक अन्याय केला जातो. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना मानसिक त्रास होऊन कोणत्या निर्णयाला सामोरे जावे लागते व त्यांच्या कुटुंबाची पालन पोषणाची जिम्मेदारी कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार सेवकावर असल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व त्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील एकूण २८,१४४ ग्रामरोजगार सेवक यांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय द्यावा, अन्यथा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर सकाळी १० वाजेपासून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. राज्यातील ग्रामरोजगार सेवकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार,गटविकास अधिकारी, ठाणेदार पोलीस स्टेशन मेहकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मेहकर तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष विनित वाघ, म. झाकिर हुसेन शेख, शंकर देशमुख, प्रकाश तायडे, भगवान अवसरमोल, संतोष राठोड, दिलीप बोराडे, मुरलीधर मोरेसह असंख्य ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.
ग्रामरोजगार सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST