वाशिम : गावखेड्यात वाडी वस्त्यावर, धावणारी, शाळकरी मुलांना सवलतीच्या दरात निश्चितस्थळी पोहोचविणारी, अंध-अपंग, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देणारी, कधी लग्नप्रसंगी दिमाखाने दारात उभी राहणारी सर्वांची लाडकी एसटी बस १ जून रोजी ६६ वर्षांची होत आहे. या एसटीचा वर्धापन दिन हा ह्यपरिवहन दिनह्ण म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्या निमित्ताने राज्यभर एसटी महामंडळात विविध कार्यक्रम सादर करून एसटीच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यात येणार आहे. त्यानिमित्त राज्यातील सर्व बसस्थानकांवर सजावट करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एसटी महामंडळाची स्थापना झाली तेव्हा पहिली फेरी १ जून १९४८ रोजी धावली. त्या घटनेला ६६ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. एसटी महामंडळाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार महामंडळाने केला आहे. प्रत्येक बसस्थानकावर रोशनाई करून प्रवेशद्वारावर रांगोळी काढून प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याची योजन महामंडळाने आखली आहे. तर वेगवेगळ्या कार्यक्रमातून एसटीच्या ६६ वर्षांच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. यात महामंडळाने समाजातील विविध घटकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. खाजगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत एसटी महामंडळाची सेवा सुरक्षित आहे. इतर वाहतुकीच्या तुलनेत एसटीच्या अपघातांचे प्रमाण जेमतेम १ टक्का आहे. यामुळेच सुरक्षित प्रवासासाठी आजही प्रवासी एसटी बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे महामंडळाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती प्रवाशांना देण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.
एसटी झाली ६६ वर्षाची
By admin | Updated: May 28, 2014 23:38 IST