साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात ३३ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पेरा केला असून सोयाबीन सोंगणीला आले आहेत;परंतु सतत पाऊस पडत असल्याने सोंगणीला विलंब हाेत आहे. सततच्या पावसामुळे उभ्या पिकाला कोंब फुटले आहे. त्यामुळे याहीवर्षी सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे.
तालुक्यात ३३ हजार १०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. सोयंदेव येथील शेतकरी शिवनारायण नागरे यांच्याकडे ६ एकर २० गुंठे शेती असून त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचा पेरा १० जूनला केला होता. सोयाबीन चांगली वाढलेली असून शेंगाही मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. २० सप्टेंबरपासून तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सोयाबीन हे पीक साडेतीन महिन्याचे असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची पानगळ सुरु झाली आहे. दोन-चार दिवसांत तोडणीला पीक आले असताना सतत पाऊस बरसत आहे. त्यातच सोयाबीनच्या शेंगा ओल्या होऊन त्याला कोंब फुटू लागले आहेत. सोंगण्या अगोदरच निसर्गाचे संकट ओढावले आहे. सोयंदेव , रुम्हणा, चागेफळ, जांभोरा , साखरखेर्डा, शिंदी , राताळी , गुंज, मोहाडी, सवडद, गोरेगाव, काटेपांग्री, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा या भागातील शेतकऱ्यांनी मजुरांना प्रतिएकर ३ हजार रुपये सोंगण्याची मजुरी अग्रीम म्हणून दिली आहे. हा पाऊस असाच बरसत राहिला तर संपूर्ण पीक मातीमोल जाण्याची भीती वर्तवली जात आहे़
काेट
सहा एकर वीस गुंठे क्षेत्रात सोयाबीन पेरले. एकरी २० हजार रुपये खर्च आला. पावसाने कोंब फुटले असल्याने घरात दाणाही येण्याची शाश्वती नाही़
शिवनारायण नागरे, शेतकरी , सोयंदेव
पाऊस कुठे पडेल आणि कसा पडेल हे हवामान शास्त्रज्ञ सांगत असले तरी त्या अंदाजाच्या पलीकडे पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती पिवळे सोने काळे लागण्याची भीती वाटते.
रामप्रसाद डिघोळे, शेतकरी