धाड (जि. बुलडाणा): येथे सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहत आलेला कचरा बाणगंगा नदीवरील पुलात अडकल्याने गावासह परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नदीकाठावरील शेतजमीन खरडल्याने शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात दमदार पाऊस पडल्याने येथील बाणगंगा नदीला मोठा पूर आला. त्यासोबतच कचरा, लाकडेही वाहून आले. हा कचरा नदीच्या पुलात अडकून पाणी तुंबले आणि पुलावरून वाहू लागले. त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचे पाणी शिरून शेतजमीन खरडून गेली. यावेळी धामणगावकडून येणारी वाहने पुलावर थांबली. यादरम्यान एक दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. नदीकाठच्या शेतात आणि गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची धावपड उडाली. धाड गावानजीक धामणगाव रस्त्यावर बाणागंगा नदीवर सन २000 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटचे नळकांडे एकावर एक रचून अनिनव पध्दतीचा असा पुल बांधला. वारंवार या पुलामध्ये पुरात वाहुन येणारा गाळ, केरकचरा अडकत असल्याने आता अर्धेअधिक नळकांडे बंद झाले आहेत. या नदीकाठी रस्त्याला लागूनच निवासी वस्ती आहे. पावसाळ्यात सलग पाऊस सुरू राहल्यास वा मोठा पूर आल्यावर या नदीवरील पुलात पुराचे पाणी अडकते. त्यामुळे पुराचे पाणी गावात, निवासी वस्तीत शिरते. कधी लगतच्या शेतांमध्ये पाणी शिरून त्यांचे नुकसान होते.
नदीकाठावरील शेतजमीन खरडली
By admin | Updated: June 17, 2015 01:51 IST