महाज्योती संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली. व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी या प्रवर्गातील मागास, अतिमागास, अतिदुर्बल घटकांतील संशोधक विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या संशोधनाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा संस्थेचा मूळ उद्देश आहे. हा उद्देश पूर्ण करून संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासणे गरजेचे आहे. मंत्री विजय वडेट्टीवार २७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महाज्योती विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जात आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी व त्यांच्या संचालक मंडळाने मागण्यांची परिपूर्तता करावी, अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे.
अशा आहेत मागण्या...
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती अंतिम निवड यादी लवकरात लवकर प्रकाशित करून तात्काळ विद्यावेतन देण्यात यावे, एमफिलच्या संशोधक विद्यार्थ्यांना सारथी, बार्टीच्या धर्तीवर विद्यावेतन देण्यात यावे, महाज्योतीकडून देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात सारथी, बार्टीच्या धर्तीवर व आकस्मित भत्ता समाविष्ट करण्यात यावा, एमफिल व पीएचडी अधिछात्रवृत्ती संलग्न करण्यात यावी, विद्यार्थी प्रवेश नोंदणीपासून अधिछात्रवृत्ती लागू करण्यात यावी, सारथी व बार्टीच्या धर्तीवर एमफिल २०१८-२०१९ च्या नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावा, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना विद्यावेतन देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी १०० मुलांसाठी व १०० मुलींसाठी व महानगरपालिका क्षेत्रामध्ये २०० मुलांसाठी व २०० मुलींसाठी वसतिगृह तात्काळ सुरु करण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.