डोणगांव : मेहकर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अचानक झालेल्या वारा व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
डाेणगाव परिसरात आरेगांव, मादणी,डोणगाव, जवळा अंजनी बु.आदी गावांमध्ये अवकाळी पावसामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, शेतकरी संकटात सापडले आहेत. डोणगाव भाग १ मधील अल्पभूधारक शेतकरी गोपाल कुटे व किरण परशराम साखरे आरेगाव यांच्या शेतातील संपूर्ण पपईची तसेच राम निंबाजी वायाळ या शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे सुध्दा नुकसान झाले आहे. अचानक आलेले वादळ आणि गारपिटीमुळे हे नुकसान झालेले आहे. आधीच बऱ्याच शेतकऱ्यांना शासनाने पीकविमासुध्दा दिलेला नाही. कंपनी शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मात्र शासनाने संबंधित कंपनवर कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली आहे. राज्य शासनाने तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ.. ज्ञानेश्वर टाले यांनी केली. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी शेतकरी गोपाल कुटे,परशराम साखरे, रामेश्वर वायाळ, गजानन वायाळ, कृषी सहायक सुनील बोंद्रे आदी उपस्थित होते.