लोणार (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तालुक्यात ठिकठिकाणी बसविलेली विद्युत रोहित्रे भंगार झाली आहेत. परिणामी विद्युत रोहित्रांतून ऑइल गळती होणे, वारंवार रोहित्रे जळणे, फ्यूज उडणे आदी प्रकारांमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. महावितरण कंपनीने ग्राहकांच्या सुविधेसाठी बसविण्यात आलेल्या रोहित्रांची देखरेख-दुरुस्ती होत नसल्यामुळे त्यांची स्थिती वाईट झालेली आहे. काही रोहित्रांवर विजेचा भार जास्त आहे, तर काहींमधून कमी दाबाचा पुरवठा होत आहे. यावर उपाययोजना करून विजेच्या भाराचे नियोजन करण्यात उपकार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता यांना अपयश आले आहेत. यामुळे विद्युत ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, व्यापारी बांधवांचे नुकसान होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही विद्युत रोहित्रांची दुरवस्था झालेली असून, पावसाळ्यात यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्युत रोहित्रांवर बसविण्यात आलेले अनेक फ्यूज बॉक्स उघड्यावर आहेत तसेच अनेक ठिकाणी फ्यूजऐवजी फक्त तात्पुरत्या तारा टाकल्या जातात. यामुळे भारनियमनाव्यतिरिक्त वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
विद्युत पुरवठा वारंवार खंडित
By admin | Updated: June 21, 2016 23:25 IST