संदीप वानखडे
बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षक भरतीच हाेत नसल्याने जिल्ह्यातील अध्यापक विद्यालये व महाविद्यालये ओस पडली आहेत. डीएलएड (डी. एड.)च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत २२ ऑगस्ट हाेती. या मुदतीत केवळ १०० विद्यार्थ्यांनीच अर्ज केला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयांवर विद्यार्थी शाेधण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात १ हजार ६६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्जच आले नसल्याने आता २९ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यात मराठी माध्यमाची एकूण २६ विद्यालये आहेत. तसेच उर्दूमाध्यमाची तीन अध्यापक विद्यालये आहेत. मराठी माध्यमासाठी एकूण १५३० जागा तर उर्दूसाठी १३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी २२ ऑगस्ट शेवटची मुदत हाेती. मात्र, शेवटच्या मुदतीत केवळ १०० च अर्ज आल्याने अनेक अध्यापक विद्यालयातील जागा रिक्त राहणार आहेत. राज्यभरातील हीच स्थिती असल्याने ऑनलाईन अर्ज करण्यास २९ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर कुठलीही मुदत वाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषदने जारी केलेल्या केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
१२वीच्या निकालाचा लाभ नाही
काेराेना संसर्गामुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गंत मूल्यमापनावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, बारावीचा निकाल माेठ्या प्रमाणात वाढला आहे़ त्यामुळे, डीएडसाठी विद्यार्थी माेठ्या प्रमाणात अर्ज करतील अशी अपेक्षा हाेती़. मात्र,यावर्षीही विद्यार्थ्यांनी अर्जच केले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, अनेक अध्यापक विद्यालयातील जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे़
शासनाच्या उदासीन धाेरणाचा परिणाम
गेल्या काही वर्षांपासून शिक्षण भरतीविषयी शासनाचे उदासीन धाेरण आहे. शिक्षक भरतीच हाेत नसल्याने विद्यार्थी डीएड आणि बीएडसाठी प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे. शिक्षण हाेण्यासाठी शासनाने पात्रता परीक्षा उत्तीर्णची अट ठेवली आहे. त्यातही टीईटी उत्तीर्ण हाेऊनही शिक्षकाची नाेकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच डीएड, बीएड महाविद्यालयांच्या वाढलेल्या संख्येचा परिणाम झाला आहे़
गेल्या वर्षीही १११९ जागा हाेत्या रिक्त
गेल्या वर्षीही विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली हाेती. मराठी माध्यमाच्या १५३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली असता प्रत्यक्षात ४११ जागांवरच प्रवेश झाले हाेते. तब्बल १११९ जागा रिक्त राहिल्या हाेत्या. यावर्षीही तीच स्थिती असल्याचे चित्र आहे. उर्दू माध्यमाच्या मात्र सर्वच १३० जागांवर प्रवेश झाले हाेते.