मेहकर : पाणी पुरवठा योजनेवर कोट्यावधी रूपये खर्च होऊनही उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते ह्या पाणी पुरवठ्याच्या योजनांची चौकशी करावी, अन्यथा आयुक्त कार्यालयात बैठा सत्याग्रह करू, असा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देताच अमरावतीचे आयुक्तांनी बुलडाणा जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी ३० एप्रिल रोजी अमरावती येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांवर आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. तरीही ग्रामीण भागातील नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणी टंचाईची ही भिषणता लक्षात घेवून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी अमरावतीच्या आयुक्तांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थीत केले होते. जर पाणी टंचाईवर शासन एवढा खर्च करीत असले तरी ज्या गावात पाणीपुरवठा योजनेवर ५० लक्ष खर्च झाले त्यागावात किमान ८ दिवसातून १ दिवस दोन तास पाणी पाणी पुरवठा व्हावा, तसेच ज्या गावात १ कोटी रुपये खर्च झाला त्या गावात दर दुसऱ्या दिवशी किमान आर्धा तास दोन वेळेला पाणी मिळावे, असे न झाल्यास ज्या यंत्रणेकडून, ठेकेदाराकडून पाणी पुरवठा योजनेवर खर्च झाला त्या सर्वांवर एफआयआर दाखल करुन शासनाची फसवेगिरी व भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास १० मे पासून १५ मे पर्यंत अमरावतीचे आयुक्त यांच्या दालनात बैठा सत्याग्रह करण्यात येईल, असा ईशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला होता. सुबोध सावजी यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेवून ३० एप्रिल रोजी आयुक्तांनी बुलडाणा जिल्ह्यातील पाणी टंचाईवर विशेष बैठक बोलावली आहे.
पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत बैठक
By admin | Updated: April 28, 2017 00:05 IST