नांदुरा : तालुक्यात अडीच लाख लोकसंख्या असतानाही नांदुरा येथे आगार नाही. नांदुरा येथे आगार निर्मिती १८ जुलै पुर्वी झाली नाही तर नांदुरा बसस्थानकासमोर आमरण उपोषण करण्याचे निवेदन एकलव्य संस्थेने विभाग नियंत्रक बुलडाणा यांना दिले आहे.आज नांदुरा बसस्थानकाहून सर्व बसफेर्या ह्या जळगाव, मलकापूर, खामगाव व बुलडाणा बसस्थानकातुन येतात त्या बसफेर्यांवर प्रवाशी वर्गाची वाहतुक आधारीत आहे. मात्र ह्या बसफेर्या अपुर्या पडतात. तर खासगी वाहनातील प्रवास महागडा, त्रासदायक व जिवघेणा ठरत आहे. नांदुरा ते जळगाव ११५, नांदुरा ते खामगाव १00, नांदुरा ते मलकापूर ९0, नांदुरा ते मोताळा ७0 व ग्रामीण भागातून शहरात सुमारे चारशे ऑटोरिक्षा ही खासगी वाहने आज रोजी प्रवाशी वाहतुक करतात. त्यांच्या तुलनेत बसफेर्या अत्यल्प आहेत. आगार निर्मितीसाठी लागणारी जागा, परिसर व सर्व सोयी उपलब्ध आहेत.पन्नास हजार हेक्टर क्षेत्रफळ असणार्या या तालुक्यासाठी बसचे आगार नसल्याने ग्रामीण भागात बसफेर्या पोहचत नाही व त्याचा फायदा घेवून खासगी प्रवाशी वाहने प्रवाशांची आर्थिक लुट करीत आहेत. त्यामुळे अस्वस्थ होवून एकलव्य संस्थेने शहरात आगार निर्मिती झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचे निवेदन विभाग नियंत्रकांना दिल्याने नांदुरा येथे बस आगार निर्मितीचा प्रश्न पुन्हा नव्याने चर्चिल्या जात आहे.
आगार निर्मितीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा
By admin | Updated: June 5, 2014 22:37 IST