मेहकर : शासनाने तूरीला ५०५० रुपये हमी भाव दिल्याने नाफेड व खरेदी केंद्रावर तूर उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी पाहता अजूनही मुदत वाढ होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांसमक्ष उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी २७ एप्रिल रोजी नाफेड केंद्रास भेट देवून पंचनामा केला. यावेळी अजूनही केंद्रावर जवळपास ३५ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतिक्षेत असल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षी खरीपाच्या पेरणीपूर्वी तुरीचे भाव दहा हजार रुपये क्विंटल असल्याने शेतकऱ्यांनी सन २०१६-१७ या खरीप हंगामामध्ये तुरीचा पेरा कमालीपेक्षा जास्त वाढविल्याने तुरीचे उत्पन्न देखील पावसाळा समाधानकारक झाल्याने दुपटीने वाढले. मात्र खाजगी बाजार व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचा भाव ३ ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल तर नाफेडचा भाव ५०५० रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर तूर विक्रीस आणली असता १५ ते २० दिवस नंबरच लागत नसल्याने शेतकऱ्यांचे वाहन भाडे हजारो रुपयामध्ये खर्ची होत आहे. शेतकऱ्यांनी १५ ते २२ एप्रिल दरम्यान वाहनांची नोंद करुन वाहन परत आपल्या सोयीच्या ठिकाणी रिकामे केले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आर्थिक, शारीरिक मनस्ताप सहन करावा लागला. या बाबीची दखल घेत २७ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, तहसिलदार संतोष काकडे, कृउबासचे सभापती माधवराव जाधव, माजी जि.प.सदस्य दत्ता पाटील शेळके, खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष देशमुख सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हजारो क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत !
By admin | Updated: April 28, 2017 00:52 IST